Tuesday, August 29, 2017

लहजा

लहजा
                           अंजली मालकर

 “या फार मोठ्या गायिका आहेत बरं का, शास्त्रीय संगीताच्या” एका अनौपचारिक समारंभात, एका वकील मित्राने त्याच्या वकील भाचीला माझी ओळख करून देताना म्हटले. माझ्या विषयाचे लेबल घेऊन फिरताना मला आतापर्यंत शास्त्रीय संगीत आवडणारी आणि न आवडणारी अशी दोन्ही टोकाची माणसं पहायला मिळाली आहेत. शास्त्रीय संगीतासारखा क्लिष्ट तरीही आकर्षक विषयासंबंधी, त्या परिघाबाहेरच्या सुशिक्षित लोकांच्या मनात त्याच्या विषयीचे आकर्षण आणि गोंधळ मला सातत्याने पहायला आणि ऐकायला मिळाले आहेत. त्यादिवशी सुद्धा या दोन वकील रसिकांचे कुतूहल, कौतुक आणि आदराचे विधान मला सुखावून गेले, ते यासाठी की वकिलीसारख्या तर्कनिष्ठ व्यवसायातले लोक देखील शास्त्रीय संगीतासारखा भावनिष्ठ पण किचकट विषयाची मजा घेऊ शकत होते. तिथे जमलेल्या प्रतिष्ठित वकील आणि लेखक मंडळींनी गप्पांच्या ओघात शास्त्रीय संगीत हा विषय काढला. एक जण माझ्याकडे बघून म्हणाले, ‘ काहो, तुमच्या बंदिशी हिंदीतच का असतात? मराठीत का असू शकत नाहीत. मी त्यांना मराठी भाषेतली कठोर व्यंजने, त्यांचा गाण्यासाठी होणारा अडथळा, खंडित होणारा प्रवाह वगैरे समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मुद्दा सोडला नाही. मृदू व्यंजने वापरून बंदिशी करता येतील इत्यादी मुद्दे समर्थनार्थ मांडू लागले. तेवढ्यात तिथे असलेले एक बहुश्रुत लेखक म्हणाले, “ अरे यांचं संगीत उत्तर हिंदुस्तानातून आले आहे, त्यामुळे ते हिंदी भाषा वापरतात.” मी एकदम चकित झाले. शास्त्रीय संगीतात शब्द हे सुरांचे वाहक असतात, असे आम्ही मनात असल्यामुळे शब्दांना घेऊन त्यांनी आणलेला हा प्रादेशिक भेद, यावर मी कधी विचारच केला नव्हता. जाणीवपूर्वक मराठी बंदिशी करणे आणि रागाला सहज घेऊन फिरू शकतील अशा हिंदी भाषिक बंदिशी घडणे, यातले ‘करणे’ आणि ‘घडणे’ यातले अंतर जाणवण्याइतके मोठे असते,हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा परिघाबाहेरच्या प्रश्नाने मला विचारात टाकले. नाही म्हटलं तरी मराठीतून बंदिशींचा प्रयत्न न.चि. केळकरांच्या काळापासून आजतागायत सुरु आहेत. त्या वैचित्र्य म्हणून गायल्या सुद्धा जातात. पण मूळ प्रवाहात रुजू शकल्या नाहीत. एरवी हिंदी बोलताना मराठीपणाचा ठसठशीत लहजा असणाऱ्या गायक कलाकारांनी उत्तम बंदिशी मात्र उत्तर भारतीय भाषेत केल्या आहेत. हे कसं काय? उत्तर हिंदुस्तानी संगीत या भागात येऊन किमान आठशे वर्षे झाली असताना, व ते आपल्या जगण्याचा एक भाग बनले असताना, त्यातली भाषा परकी कशी होते? अशा अनेक प्रश्नांचे या निमित्ताने मनात उठले. समोर अनेक पारंपारिक बंदिशींचे शब्द आणि त्या गायल्या गेलेल्या अनेक बुजुर्ग कलाकारांचे रेकॉर्डिंग समोर दत्त म्हणून उभे राहिले. त्यांच्या उलटतपासणीत पहिला मुद्दा लगेच लक्षात आला. तो हा की, उत्तर हिंदुस्तानी ख्याल संगीताच्या बंदिशी या हिंदी भाषेत कमी आणि ब्रज, मैथिली या पोटभाषेत अधिक आहेत. म्हणजे व्याकरणनिष्ठ नागर भाषेपेक्षा भावनिष्ठ बोलीभाषेला इथे झुकतं माप दिलं आहे. त्यामुळे ‘पिया’ या शब्दाला ‘पियर’, ‘पियरवा’, ‘पियू’, ‘पी’ किंवा ‘गगर’ या शब्दाला ‘गगरी’, ‘गागर’, ‘गगरीया’ असे अनेक पर्याय रचनाकाराला मिळाल्यामुळे या लवचिक भाषेला अधिक स्वीकारले गेले. याच लवचिकतेने सुराधिष्ठीत गायन प्रवाही केले. शब्द हे दगडी अडथळे न ठरता, रागात वापरल्या जाणाऱ्या अमूर्त स्वरभावांचे सुंदर शिल्प झाले. सुरांचे प्रवाहित्व अबाधित राखण्यासाठी मग बंदिशीतल्या जोडाक्षरांनाही गोंडसपणे तोडून विलग अक्षर गाण्यात गायकांना जरा ही संकोच वाटला नाही. त्यामुळे ‘तुर्कमान’चे ‘तोरेकमान’, ‘प्रताप’चे ‘परताप’ म्हणून गाताना, शब्द गाणाऱ्याच्या तोंडात खड्यासारखे न लागता, खडीसाखरेसारखे ते सुरात विरघळून जातात. अशा उच्चारातून स्वर, लय मिळते आणि स्वरलयीतून तल्लीनता ! त्यामुळे सुराच्या भाषेचे मराठी सारख्या सडेतोड भाषेपेक्षा मृदू व्यंजनी हिंदीतल्या बोलीभाषेशी सख्य असणे स्वाभाविकच आहे असे वाटले.

शास्त्रीय संगीत आस्वादनाच्या एका छोटेखानी मैफिलीत, रागसंगीतातल्या एका नवसाक्षर रसिकाने मला विचारले ‘ का हो, तुमच्या बंदिशींमध्ये सैंया, सास, ननंद या शिवाय इतर विषय नसतात का? आणि तुम्ही शब्द विसरल्यासारखे एकच शब्द सारखा का म्हणता? अशा प्रश्नांमुळे ख्याल संगीतातील बंदिशींची घडण आणि हेतूकडे अधिक डोळसपणे पाहू लागले. रागसंगीतातील इतर गायनप्रकारांमध्ये ख्यालसंगीत हा सर्वात आधुनिक प्रकार मानला गेला आहे. धृपदातली रागशुद्धता, कव्वालीतली तानक्रिया आणि ठुमरी, दादरा,कजरी या लोकगीतप्रकारातून आलेले शब्द, यांच्या संयोगाने या गायन प्रकाराची निर्मिती झाली असे संगीतज्ञ मानतात. जेव्हा शब्दाधिष्ठीत काव्यप्रकार स्वराधिष्ठीत गायन प्रकार म्हणून बदलले तेव्हा त्यांची अनेक कडवी गळून पडली. फक्त स्थायी आणि अंतरा ही दोनच राहिली. मग या दोन कडव्यांना रागातील स्वरवाक्यांच्या झालरी लावून त्या मखरात एका अमूर्त भावस्वप्नाची स्थापना करणे हा या गायन प्रकाराचा हेतू बनला. एकाच शब्दाला रागातल्या अनेक स्वरवाक्यांनी खुलवणे ही त्या भावस्वप्नाकडे जायची एक रीत झाली. शब्द जरी तोच तोच असला तरी त्यांची स्वर रीत वेगळी असते. शब्दावर स्वर मांड टाकून त्याला एका अनामिक अवस्थेकडे नेतात, तेव्हा ही सुरांची भाषा अधिक बोलकी होते. स्वरांची झुंबरं जर लक्षवेधी करायची, तर शब्द दालनाच्या भिंती साध्याच असाव्या लागतात. त्यामुळे प्रेमासारखा चिरंतन विषय असो, जीवन तत्वज्ञान असो किंवा ऋतूवर्णन असो, सामान्य लोकांना आवडेल, रुचेल अशा विषयवास्तूतून नादाच्या अनिर्बंध,असीम सफरीला नेणे या गायनप्रकाराचे ध्येय बनले. ज्या शब्दांच्या पालख्या रागातले स्वर वाहून नेतात त्यांची नक्षी मी आता अजून जवळून बघू लागले. शब्दोच्चाराबरोबरच कुठल्याही रागांचे स्वर, त्या स्वरांची लय, त्यांचे उच्चारण आणि त्यातून साधली गेलेली भावप्रभा हा संस्काराचा परिणाम असतो. तो संस्कार गुरु शिष्यावर घडवत असतो. या विचारांच्या दिशा मला प्रादेशिक रागांकडे घेऊन गेल्या. प्रादेशिक भाषेतले शब्द तिथल्या संस्कृतीचा आरसा बनून, तिथल्या धुनांमध्ये न्हाऊन रागाच्या कोंदणात बसून येतात तेव्हा त्यांचा सुवास रातराणीच्या फुलांसारखा दरवळतो. माझ्या डोळ्यासमोर धनाश्री रागाची बंदिश तिच्या रंग वेषासाहित तरळू लागली. ‘थे म्हारो राजेंद्र, मोह्यो मोह्यो ढिली नथवाली’ गाताना नाकात मोठे, जड नथ घातलेल्या  राजस्थानातल्या मरूभूमीतल्या स्त्रिया आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करताना दिसू लागल्या. धनाश्रीतल्या स्वरांची लगबग लय, रागाची छोटी स्वरवाक्य आणि गाताना ‘ढिली’ला दिलेला हलकासा झोका ! रंगीलो राजस्थानचे गानचित्र उभे करून गेले.
जुन्या बंदिशींच्या शोधात, अशाच एका बंदिशीने माझा ठाव घेतला तो ‘ ए नबी के दरबार, सब मिल गावो बसंत की मुबारकी’ या बसंतच्या बंदिशीने. बसंत रागाची चैनदार लय. स्वरांच्या लगावातली भव्यता आणि दरबारातला बसंतोत्सव शब्दांमधून येताना तिचे सर्व सामाजिक, राजकीय संदर्भ घेऊन येत होता. केवळ शब्दच नाही तर बंदिशींच्या व्यंजनांचे, त्यातल्या स्वराचा लहजा, नादोच्चाराच्या वेगळ्या जाणीवा निर्माण करतात. ‘हँस हँस’ म्हणताना उच्चारलेला अनुनासिक ‘ह’ जेव्हा छातीच्या पोकळीतून येतो, तेव्हा नकळत अस्फुट हास्याची भासमानता तयार होते. ‘रंग’ म्हणताना जेव्हा ‘र’ चा ‘रौं’ होतो, तेव्हा अनुनासिक तीव्रता साऱ्या रागछटेत गडदपणा आणते. असं म्हणतात की सामगायन काळात प्रत्येक ऋचा गायनाचे फळ ठरलेले असायचे. आज वाटते की ते फळ म्हणजे त्या नादोच्चारातून निर्माण झालेले नादवलय असावेत, जे सजीवांना सुखाच्या जाणीवेपर्यंत घेऊन जायचे. रागदारी संगीतातील बंदिशी वाचताना, ऐकताना मला वाटून गेले की यांच्या उच्चारणाच्या ढंगदार लकबी त्यांना जिवंत करतात. त्यांच्यातला काव्यार्थ आणि काव्याला लगटलेला स्वरार्थ तिचे व्यक्तिमत्व घडवतातच या शिवाय कलाकाराची गायकी देखील घडते. अशा बंदिशी आणि त्यातल्या गायकीचे सांस्कृतिक मूल्य आतल्या खणात ठेवलेल्या वंशपरंपरेने चालत आलेल्या दागिन्यांसारखे असते. एकदा का या घडणावळीचे मर्म कळले की मग आत्मानंदाचा सुवास शतगुणित होतो. मन हलकं होतं. अत्तराचा सुगंध कुठूनसा येऊन चित्तवृत्ती प्रफुल्लीत होते. कदाचित हाच परिणाम रागसंगीतातील बंदिशींमधून अपेक्षित असावा.
लेखक मित्राच्या प्रश्नातून घुसळून निघालेल्या विचार मंथनाने पारंपारिक बंदिशींकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. ओबडधोबड काव्याच्या आडून त्यांची समाजाशी घट्ट जोडलेली नाळ दिसून आली. रागाच्या एकत्वातून बंदिशींचे प्रादेशिक वैविध्य, देशाच्या हरवलेल्या समृद्ध पाऊलवाटा दाखवून गेले.           


Tuesday, April 18, 2017

सुवर्णभूमीच्या स्वरसावल्या




                   सुवर्णभूमीतल्या स्वरसावल्या                   

                                                 अंजली मालकर                                       

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गोष्ट तुमच्या माझ्या पूर्वजांच्या पूर्वजांच्या पूर्वजांची. एका आटपाट देशामध्ये ते रहायचे. देश कसला मोठ्ठा प्रदेशच होता तो. उपखंडच म्हणा ना त्याला ! सुजलाम सुफलाम त्याचे नाव होते. नावाप्रमाणेच होता तो भाग, सदाहरित वृक्षराजिंपासून मोसमी झाडांपर्यंत असणारी जंगलं, खळाळणाऱ्या अवखळ झऱ्यापासून महाकाय नद्यांपर्यंत नवजीवन पाणी, लांबून सुद्धा ज्याचा दाह जाणवायचा अशा गंधकाच्या उष्ण स्रोतापासून हाडं गोठवणाऱ्या हिमनगापर्यंत पर्वत, क्षितिजापर्यंत पसरलेल्या वाळवंटापासून डोळ्यात मावणार नाही इतक्या दूरवर हजारो गलबत वाहून नेणाऱ्या सागरापर्यंत, किडे, मुंगी, पशू, पक्षी काय नव्हतं या उपखंडात. पृथ्वीवरच्या भौगोलिक वैविध्याचे लघुरूपच जणू ! सुजलाम सुफलाम मध्ये राहणारी संस्कृती सुद्धा अशीच बहुरंगी बहुढंगी. कित्ती प्रकारचे वेष, केवढ्या भाषा, खाण्या पिण्याच्या केवढ्या पद्धती. नंदनवनच म्हणायचं की याला ! अशा रंगाढंगात वावरणारी इथली माणसं बुद्धिमान, लवचिक आणि श्रद्धाळू होती. अध्यात्म, कला, तत्वज्ञान, भाषा आणि उपचारपद्धती या पाच अदृश्य धाग्यांनी इथल्या माणसांभोवतीचे कोष घट्ट विणले गेल्यामुळे ती त्यात अत्यंत सुरक्षित होती. बाहेर कितीही आक्रस्ताळेपणा झाला तरी मनाचा गाभा शाबूत राही. मनात उमललेली स्वप्न पंचमहाभूतांवर स्वार होत आणि ज्ञानाची कवाडे सताड उघडी होऊन नाद, स्पर्श, रूप, गंध आणि रसनेची अलौकिक आभूषणे समाजात मूर्त रूपात प्रकट व्हायची. बुद्धिमत्तेचा पिवळा, चैतन्याचा हिरवा आणि भक्तीच्या भगव्या रंगातून फाकलेल्या सुवर्णप्रभेने या अवघ्या उपखंडाला सुवर्ण भूमी केले होते. पुनर्जन्मावर प्रगाढ विश्वास आणि  मोक्षसाधना हेच आयुष्याचे अंतिम ध्येय अशा मुशीतून घडलेल्या इथल्या लोकमानसाच्या सावल्या स्थिरता आणि दैववादाच्या अद्भुत मिलाफातून बनल्या होत्या. समाजरचनेतल्या आपल्या आपल्या पायऱ्यांचा मनापासून स्वीकार करून त्यात आयुष्याची सार्थकता शोधणे यात इतर सर्व लोकांप्रमाणेच तिथली कलाकार मंडळीही सहभागी होती. राजाश्रयातील स्निग्धता, स्वप्रतिभेच्या सुगंधाची उमज आणि कला निर्मितीतून मोक्षसाधनेचे ध्येय हेच त्यांचे भाव विश्व होते. एकाच कला प्रकाराचा ढोल बडवण्यापेक्षा बहुपदरी कलाज्ञानातून आलेली समृद्धता शिल्प, प्रासादे, मंदिरे यातून ओसंडून वाहत होती. समाजातील या सौख्याचे समाधान लोकोत्सवात गाणाऱ्या, वाजवणाऱ्या तुर्यवादकाच्या आनंदी चेहऱ्यांवर स्वच्छपणे दिसून येई. अवकाश तत्वाशी नाते सांगणारी नादविद्या आणि स्थापत्य कला यांचा सूक्ष्म अभ्यास करून नर्तकी राणीच्या रंगमंडपात शेकड्याने उभे असलेले वाद्यनादाचे स्तंभ तिच्या संगतीसाठी कोरण्याची किमया करणाऱ्या किमयागार कलाकारांनी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हा वारसा ठेवला होता. आपल्या प्रज्ञेच्या जोरावर संगीतासारख्या अलवार कलेला शिल्परूपात गोठवून ठेवण्याची किमया त्यांनी साधली होती.     या अशा विस्मय चकित करणाऱ्या कलाकृतींचे पडसाद नंतरच्या अनेक पिढ्यांना एकाचवेळी अंतर्मुख आणि बहिर्मुख करून जात होती.
परंतु काळाची चक्रे फिरली. सुजलाम सुफलाम स्वप्नभूमीला ग्रहण लागले. सुवर्णमृगाच्या सुगंधाने वेडावलेले याचक या भूमीचे दार ठोठावू लागले. अतिथीच्या रूपाने आलेल्या काळाने, दिलेल्या ओसरीचा अपमान करीत घराचा ताबा मिळवला. ज्या घराची दारे उघडली नाहीत, ती दारे फोडून तिथली समृद्धता लुटून नेण्याचा उद्दामपणा देखील करण्याचे त्यांनी सोडले नाही. इतके दिवस लुटुपुटुच्या लढायांची सवय असलेल्या या सुवर्णभूमीतल्या लोकांच्या मनाच्या गाभ्यालाच जेव्हा धक्का बसला तेव्हा सारा उपखंडच थिजून गेला. जगण्याचा जीवनरस असणारे दृश्य अदृश्य धागे तुटू लागले आणि सारा समाज सैरभैर झाला. हे सारे हतबद्धपणे पाहत असलेल्या कलाकाराला प्राणापलीकडे जपलेल्या कलेची विटंबना सहन करणे जेव्हा शक्य झाले नाही, तेव्हा त्याने कलेला सती चढवले. आपले प्रज्ञाचक्षु बंद करून टाकले आणि राजाश्रयाची स्निग्धता हरपल्याने मोक्षमार्ग स्वतःसाठी आणि इतरांसाठीही नाकारला. इतिहासाला एवढी जबर शिक्षा कुठल्याच काळात मिळाली नव्हती. ऐहिक श्रीमंतीचा पुरेपूर उपभोग घेणाऱ्या याचकाला या भूमीच्या कलेतली समृद्धी कळलीच नाही. इथल्या मनांचा धागाच उलगडला नाही. पुढच्या काळात सत्ताधीशांनी मग आपल्या पद्धतीने ही समृद्धी विलासितेत परिवर्तीत केली. आता गर्भरेशमी वस्त्रातल्या मखमली तेजापेक्षा चटकदार चमकेचा भाव जास्त वधारला होता. लोकोत्सवातले तुर्यवादक अस्वस्थ झाले होते तर किमयागार कलाकारांची प्रतिभा निस्तेज झाली होती. संभ्रमातून आलेल्या निष्क्रियतेचा अंमल साऱ्या समाजावर चढू लागला. स्त्रियांचा मुक्तपणा बंदिस्त झाला. पारंपारिक ज्ञानाचे कंबरडे मोडले. कलाकार देशोधडीला लागले आणि समाज जीवनाची घडी विस्कटली. जसे जसे समाजाला हीनत्व स्वीकारण्यात धन्यता वाटू लागली तसा तसा या सुवर्णभूमिच्या समृद्धतेभोवती फास आवळला गेला................
न जाणे कितीक पिढ्या तशाच गेल्या. आता इथल्या माणसांभोवती असलेल्या कोषाचे धागे विदीर्ण होऊन त्यांची मनं कधीच उघड्यावर आली आहेत. समृद्धतेच्या कलेवरावर देखील आता खरेदी विक्रीचे ठोक व्यवहार या सुजलाम सुफलाम देशात होतात. स्थिर चित्ताच्या निढळ मनाला आता शोधावे लागते. भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी स्वीकारलेली तडजोड राजरोस झाली आहे. प्रज्ञा आणि समाधानाचा आस्वाद घेणाऱ्या हाडामांसाचे कलाकार दुर्मिळ झाल्यामुळे वीजेवर चालणारी रसहीन वाद्ययंत्र मानवी आनंदाची  रोबोटिक अभिव्यक्ती बनली आहे. जगण्यासाठी काम न करता कामासाठी जगणाऱ्या यंत्रमानवी कलाकारांची फौज ही सध्या इथली कथा आणि व्यथाही. सामुहिक प्रतिभांचा वापर तेव्हाही होता आजही आहे. फरक पडला तो स्वप्नांमध्ये ! 

आज रणरणत्या उन्हात कालच्या समृद्ध अवशेषांचे शिल्पस्वर ऐकताना आणि त्याच वेळी वास्तवातला गोंगाट पाहताना मन काहूरले. त्याच मातीत जगलेल्या आणि जगणाऱ्या दोन वेगळ्या जगांचा महासेतू बांधताना माझी दमछाक झाली. कलाकाराची भावुकता आणि नियतीची तटस्थता यांचे द्वंद्व बघताना बेचैन झाले. अनुपम अशा कलाभूमीत अजूनही एखादा चैतन्यमयी स्वर कोणीतरी गाईल या आशेने, ही शोधयात्रा थोडी थांबवून पुन्हा सुरु करण्याच्या मानसाने मी परत फिरले.  
   

Thursday, April 6, 2017

शोध एका जिप्सी स्वराचा ..........




                              
                                
शोध एका जिप्सी स्वराचा ..........
                                                    अंजली मालकर


भारतीय संगीताच्या निरंतर प्रवाहात असे काही कलाकार होतात जे ‘मार्गी’ असतात. नवीन मार्गाचा शोध घेत, प्रचलित क्षितिजे विस्तारण्याचे काम करतात. संगीताच्या स्वर,लय,शब्द या मूळ घटकांकडे पुन्हा नव्याने पहात एका अर्थाने परंपरेचा वसा पुढे चालवत असतात. किशोरी आमोणकर हे या मार्गी कलाकारांमधले ठळक नाव होते. माझ्यापुरते बोलायचे तर ‘किशोरीताई’ या fatal attraction चा शोध अपूर्ण राहणार याची चुटपूट मनात कायमची राहणार असे वाटून गेले. त्यांच्या स्मरणरंजनात राहताना आठवले ते पोथीनिष्ठ तरुण मनावर पडलेले भूप, बागेश्री आणि जौनपुरीचे आव्हानात्मक ठसे. त्या अबोध वयातही ‘बाजे झनन’ मधला आवेग स्पर्शून गेला होता. ‘छननन बिछुवा’ मधला खनकदारपणा त्यावेळी भलताच आवडून गेला होता. गाणे शोधण्याच्या प्रवासात मला किशोरीताई नावाचे वादळ कळत्या वयातच भेटले. अनेक थोरामोठ्यांच्या उंचावलेल्या भुवया, तटस्थ आवाज झेलीत छातीठोकपणे उभे ठाकलेले वादळ ! चौकटीतले प्रश्न सोडवण्यात गुंतले  असल्यामुळे, या चौकटीबाहेरच्या प्रश्नाला तेव्हा वैकल्पिक म्हणून सोडून दिले होते. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात त्याच्याकडे पाहता येईल म्हणून त्यांच्या विचारांना तेव्हा बाजूला ठेवले होते. पण या विचारांनी परत परत धडका देऊन, असे फार काळ बाजूला ठेवता येणार नाही अशी तंबीच मला तेव्हा दिली होती. शास्त्राला वाकवत, कधी झुगारत, तर कधी कधी त्याच्याशी दोन हात करत, त्याचेच तत्व त्याच्या गळ्यात टाकण्याचा ताईंचा बेधडकपणा समजून घेण्याची माझ्या कलामनाची कुवत एकीकडे वाढवत असताना दुसरीकडे स्वतःच्या अनुभवाशी एकनिष्ठ राहून तर्क आणि विवेकाचा काटा तोलत होते.....

वेळ सकाळची. टिळकस्मारक मध्ये किशोरीताई गाणार होत्या. हॉल संपूर्ण भरलेला होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. टाळ्यांच्या कडकडाटात ताई स्वरमंचावर बसल्या. त्यांनी हातात स्वरमंडळ घेतले, डोळे मिटले आणि तोडीच्या स्वरांनी रंग भरायला सुरुवात केली. बराच वेळ षड्जाभोवती घुटमळत त्यांनी कोमल रिषभ लावला, आणि रसिकांची कुजबुज सुरु झाली. माझ्या शेजारच्याने त्वरित कोमल रिषभ ‘चढा’ लागलाय असा निर्वाळा देऊन टाकला. माझ्या तोपर्यंतच्या स्वरानुभावानुसार तो रिषभ चढाचहोता. त्या दिवशी ताईंनी संपूर्ण मैफल त्या ‘चढ्या’ रिषभाने रंगवली. कार्यक्रम संपल्यावर मी विचार करू लागले तर जाणवले ते संपूर्ण रागभर राखलेले ‘चढा’ रिषभाचे स्थान, त्याला वापरून केलेल्या विलक्षण स्वरसंगती आणि गवताच्या पात्यासारखे लवलवित स्वर ! तो राग त्यादिवशी माझ्या डोळ्यात अंजन घालून गेला. त्या कार्यक्रमानंतर त्यांचा तोडी अनेकवेळा ऐकायला मिळाला. पण त्या दिवशीच्या तोडीने कला, कलाकार आणि परंपरा यावर जे भाष्य केले, त्याने माझी रागरसास्वादाची अनेक कवाडे उघडली. संगीतासारख्या श्राव्य कलापरंपरा कालप्रवाहात वाहताना एखाद्या महानदी सारख्या आपला प्रवाह बदलता ठेवत असतात. त्यात रागातल्या स्वरांच्या श्रुतींचे थांबेदेखील काळाच्या प्रवाहात बदलतात. काल ज्या श्रुतीचा थांबा स्वर झाला असतो, तो कदाचित आज नसतो. उद्या अजून वेगळाच असू शकेल. इतक्या सूक्ष्म पातळीवर चाललेल्या श्रुतींच्या भरती, ओहोटीवर आपली हुकुमत ठेवणे अशक्यच ! त्यामुळे त्याक्षणी कलाकाराच्या सृजनपटलावर स्वराची कुठली ‘कला’ उमटेल आणि ती ‘कला’ घेऊन तो कलाकार रागाच्या किती कॅलिडीओस्कोपिक सौंदर्याकृती निर्माण करून त्याचे भावबंध रसिकांपर्यंत पोहोचवतो हीच त्याची कामगिरी !

जन्माच्या आधीपासून गाण्यात बुडालेल्या किशोरीताईंना त्यांच्या घराण्याच्या पारंपारिक ज्ञानाचे आकलन खूप लवकर झाले. घरातून मिळालेली गाण्याची सौंदर्य खाण आणि त्याच्याविषयी बाहेरच्या जगात असलेली उदासीनता, अज्ञान यातून त्यांच्यातला कलाकार डिवचला गेला असावा आणि जे हाती घेईन ते सुंदर करून ठेवीन या मनस्वी आवेगाने त्यांनी मुळातून काम सुरु केले. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे गायन परंपरांचे पुनरावलोकन त्या करू लागल्या. भरताच्या नाट्यशास्त्रापासून जगन्नाथ पंडिताच्या रसगंगाधरापर्यंत अनेक रसशास्त्र, नाट्य, काव्य ग्रंथांचे वाचन मनन, चिंतन करण्याच्या ओघात संगीतातील प्राणघटक ‘स्वर’ याचे दर्शन त्यांना घडले. स्वयंप्रकाशी उर्जा जेव्हा कंठातून उमलते, तेव्हा तिचा असर स्वतःसह सर्वांना आपल्याकडे ओढून नेतो याची जाणीव किशोरीताईंना याच दरम्यान झाली असणार. त्यानंतर त्या असराचा शोध घेण्यासाठी त्यांचे मन जिप्सी झाले. त्याच्या शोधात व्याकूळ झाले. ही विरहदग्धता जेव्हा स्वररूपाने प्रस्फुटीत झाली, तेव्हा रागरूपाची मानवी बंधने गळून पडली. कधी ती झुगारली देखील गेली ! हा स्वरकृष्ण एकांतात भेटू शकतो असे वाटल्यामुळे चिंतन, मनननाने एकांतिक झालेल्या किशोरीताई अधिकाधिक आपल्याआपल्यात राहू लागल्या. ‘भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ अशी अवस्था त्यांची झाली असणार. एकीकडे या स्वयंप्रकाशी उर्जेचे गुपित रसिकांना सांगण्याची तळमळ, तर दुसरीकडे ती निसटून जाईल म्हणून जगाला पाठ करून त्याच्या मागे धावण्याचा आवेग, अशा द्वंद्वात सापडलेले त्यांचे कलामन मला त्यांच्या कलाविचाराचा मागोवा घेताना दिसू लागले. अर्जुनाला बाण मारताना झाडावरल्या पक्षाचा फक्त डोळाच जसा दिसत होता, त्याप्रमाणे किशोरीताईंना केवळ ‘स्वरत्व’ दिसू लागले होते. स्वरातली लय, शब्दातील स्वरत्व, त्याची व्याप्ती, स्वरभाव, त्याचा प्रभाव यांच्या अस्पष्ट जाणीव त्यांना अस्वस्थ करू लागल्या. त्या ‘स्वराला’ सखा बनवण्यासाठी धडपडत होत्या. त्यामुळे व्यावहारिक जगातले विसंगत आयुष्य त्या जगत असतानाही या विसंगतीकडे डोळेझाक करून त्यांच्या स्वरामृताला प्राशन करण्यास उत्सुक असलेला रसिकवर्ग सदोदित त्यांच्या मैफलीला हजर असायचा. स्वरसख्याबरोबर राहताना त्यांचा स्वरभाव कधी आरक्त राधेचा होई तर कधी विरागी मीरेचा ! त्यांचे गाणे मानवीय होते. मनुष्याच्या अनंत रंगात रंगलेले त्यांचे स्वर त्यांच्या जीवनदर्शनाचा मोठा भाग व्यापून होते.

सृजनशील कलाकार ही मोठी बेटं असतात. किनाऱ्यावर उभे असणाऱ्या लोकांना ती स्वतःकडे खेचून घेतात. त्यांच्यावरील सौंदर्यशोभा पाहणाऱ्याला नेत्रसुख आणि चित्तशांती देतात. पण जर त्या बेटाच्या जवळ गेलात तर तुमचे स्वागतच होईल असे नाही. ते जरी अंगाखांद्यावर वृक्ष, वेली, झुडुपं खेळवत असली तरी एका क्षणी ते बेट कोणाचेच नसते. ते केवळ स्वतःचेच असते. त्याची सुखदुःख त्याचीच असतात. ती इतर कोणाची नसतात, होऊ शकत नाहीत. किशोरीताई देखील अशाच एक बेट होत्या. जगात असताना रागांचे रागत्व स्वरांमधून शोधत त्या फिरल्या. आता उरलेला शोध त्या दुसऱ्या जगाच्या  मैफलीत घेतील. दात्याने दिलेला प्रत्येक श्वास त्यांनी स्वरध्यासासाठी खर्च करून त्यांच्या जीवनाची मैफिल रंगवली. आता त्या आयुष्याच्या प्रबंधाचा आभोग पूर्ण करून संगीताच्या आकाशात ‘ध्रुव’ झाल्या आहेत. या धृवाकडे बघून आता मागून येणाऱ्या वाटसरूंना पुढची वाट दिसेल. 





Tuesday, March 7, 2017

शुद्धकल्याणच्या निमित्ताने




             शुद्धकल्याणच्या निमित्ताने .......

                                    अंजली मालकर


कलेचे प्रवाहित्व हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण मानले गेले आहे. शतकानुशतकाच्या वाहण्यात त्यातल्या काही गोष्टी बदलतात, काही पुढे प्रवाहित होतात. संगीतकला विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीतासारख्या कलेमध्ये, ज्यात पारंपारिक कला सौंदर्याची गृहीतके असोशीने सांभाळली जातात, नव्हे मिरवली जातात, त्यात बदलाचा स्वीकार जरा उशीराच होतो. काळाच्या प्रवाहात रागरूपे बदलतात, प्रस्तुतीकरण बदलतात, कधी कधी कलेची उद्दिष्टे देखील थोड्याफार फरकाने बदलतात. पण सूर लयीची चिरंतन मुल्ये अबाधित रहातात, रहात आली आहेत. सूर लयीशी एकरूपत्व हे पूर्वीसुद्धा आणि आजही कलेचे सर्वश्रेष्ठ ध्येय मानले गेले आहे. परवा कृष्णाजी गाडगीळ स्मृती सभेत पं. विकास कशाळकर यांनी गायलेला शुद्धकल्याण अशीच चिरंतन संगीतमुल्ये दाखवून गेला.
कशाळकर सर माझे गुरु. एखाद्या शिष्याने गुरूविषयी काय बोलावे? जवळच्या माणसाविषयी बोलणे खरंतर अवघडच नव्हे अशक्यच असते. सरांच्या या आधी अनेक मैफली मी ऐकल्या आहेत. तरीपण गुरूच्या गायनाचे परिपक्व दर्शन आणि शिष्याच्या संगीत आकलनाचा परिपक्व टप्पा म्हणून या सभेतल्या शुद्धकल्याणाकडे  मला पहावेसे वाटले. त्यांनी गायलेल्या शुद्धकल्याणने शास्त्रीय संगीतातील मला माहित असलेल्या काही पारंपारिक मूल्यांना प्रश्न विचारले. मैफिल मारणारे गवयी म्हणून सरांचा लौकिक नाही, पण शास्त्रशुद्ध, प्रयोगशील, अभ्यासू कलाकार म्हणून शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांचे नाव आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गायनाने माझ्या संगीत चिंतनाला परत मुळाकडे नेले.
शास्त्रीय संगीतात घराणेदार गायनासाठी भरदार, पल्लेदार आवाजच लागतो, नाहीतर ते सुगम संगीत होते या माझ्या पहिल्या गृहितकाला त्यांनी छेद दिला. सरांचा आवाज पातळ आणि मर्यादित पल्ल्याचा. पण जेव्हा या गृहितकाला बाजूला सारून त्यांच्या आवाजात डोकावले तर जाणवली ती आवाजाची पारदर्शक, हलक्या जवारीची नाजूक स्थिरता ! साबणाच्या पाण्याचा मोठा बुडबुडा अलगद हातावर स्थिरावावा इतका अलवारपणा. मग मी अजून आत शिरले, तेव्हा दिसले सौम्य, मधुर विशुद्ध सूर ! एरवी अनेकवेळा आपला मुद्दा पटवण्याच्या नादात स्वरांवर अवाजवी दाब दिला जातो, विनाकारण आवाज मोठा होतो. अहंकाराची छोटी खेळीच असते ती. पण इथे जाणवला तो सुरेल तंबोऱ्याला समर्पित सहज सूर. शुद्धकल्याण मध्ये षड्जावरून धैवताकडे जाताना लागणारा निषाद, आणि पंचमाकडून गांधाराकडे जाताना लागणारा तीव्र मध्यम, पक्ष्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर  बसताना हलकेच उतरावे असा होता. ते उतरणे इतके हलके, की मला वाटले हा स्वरपक्षी फांदी चुकणार. बसताना देखील कुठे धडपड नाही, अंदाज चुकण्याचा संदेह नाही. त्या अलगदपणाने शास्त्रीय संगीतातील माझ्या ठोसपणाच्या गृहितकाला दुसरा धक्का दिला. शुद्धकल्याणची ही सात्विक सुंदर शीतल आभा, पूर्णचंद्रासारखी मैफिल भर पसरली होती. तिलवाड्याचा ठेका सुरु झाल्यावर स्वरलयीचे नक्षीकाम सुरु झाले. रागवाक्य छोटी होती, पण फेड आउट आणि फेड इन मुळे ती तंबोऱ्यात मिसळून त्यांना दिर्घत्व मिळत होते. लहान श्वासात इतकं सहजपणे मांडणे, ते ही कुठलीही ओढाताण स्वतःला आणि इतरांना न जाणवता, म्हणजे मनाच्या स्थैर्याची केवढी मशागत असणार ! गाताना सर दोन रागवाक्यांमध्ये अवकाश ठेवत होते. कधी एका मात्रेचा तर कधी दोन मात्रेचा अवकाश. एक वाक्य संपल्यावर दुसरे वाक्य टाकायच्या मधला अवकाश असा काही तोलत होते की जसं काही अवकाश पेरत त्यांची आवर्तनाची कशिदाकारी चालली आहे. तंबोऱ्याला लगडलेले शुद्धकल्याणचे सूर आणि लयीला बिलगलेल्या रागवाक्याने सगळेच जण ‘प्रवाहपतित’ झाले होते.
शब्द, हे शास्त्रीय संगीतात स्वर टांगायच्या खुंट्या आहेत किंवा अडगळ असतात अशी धारणा असणारे बरेच गायक आहेत. माझी अशी धारणा नसली तरी शास्त्रीय संगीत हे सुराधीष्ठितत संगीत असल्यामुळे शब्दांवर विशेष मेहनत घ्यायची गरज नसते या गृहितकाला देखील शुद्धकल्याणने छेद दिला. व्यंजनांच्या शेवटी येणाऱ्या आकार, इकार, उकार आणि मकार यांना श्वासाच्या नियंत्रित दाबाने फुलवले तर त्यांची प्रभा किती उल्हासित करू शकते याची प्रचीती सरांच्या शुदकल्याणने तेव्हा दिली. कधी इकाराच्या चपटेपणाला धारदार करीत, कधी उकारात स्वरांची भेंडोळी सोडत, ‘न’ कारात नाकाचा संयमित वापर करीत त्यांनी या अमूर्त नादाकृती अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण केल्या. एका लयीत धावणाऱ्या घोडागाडीत बसल्यावर जी एकतानता जाणवते, ती, सरांच्या बोलताना आणि ताना ऐकताना तिथे जमलेल्या श्रोत्यांना लागली होती. मधाळ आलापी नंतर सुखावह वाटेल इतकाच जोर देत गमक आणि आघातांच्या तानलडी बरसत होत्या. अनेकवेळेला अवाजवी पुरुषी आक्रमकता दाखवण्यासाठी अंगावर धावून येणाऱ्या किंवा डोक्याला मुंग्या येतील इतक्या खाली वर ताना घेणाऱ्या अनेक गायकांच्या तुलनेत या ताना अंगभर मोरपीस फिरवून गेल्या. माझ्या मनाची तृप्ती झाल्यामुळे माझ्यासाठी ही मैफल इथेच संपली होती. खरतर कुठल्याही मैफिलीचे यश हे केवळ कलाकारच नाही तर रसिकांवर देखील अवलंबून असते. भिंग लावून चुका काढण्यापेक्षा, रसिकांचे मनाचे औदार्य, सहिष्णुता कलाकाराची कला आणि कलाकार या दोघांना वेगळ्या उंचीवर नेते. याचाही अनुभव या मैफिलीच्या निमित्ताने आला. मोठमोठ्या समारोहामध्ये भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी श्रोत्यांना न बघता छोट्या बैठकांमध्ये रसिकांच्या नजरेला नजर देऊन पावती मिळवणाऱ्या मैफिलींची रंगत या सभेत  शुद्धकल्याणने आणली. गाणं कुठल्या घराण्याचे होते, किती कौशल्यपूर्ण होते, शास्त्रीय कसोट्यामध्ये किती बरोबर होते, यापेक्षा विचारांचा एकजिनसीपणा, कल्पकता यातून निर्माण होणारा प्रवाह या रागाने मला दाखवला. त्यातील मानवीयता मला अधिक व्यापक आणि उदार बनवून गेली. प्रवाहात गाण्याचे आणि जीवनाचे देखील सार दडले आहे, या शाश्वत मूल्याची या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण हा शुद्धकल्याण देऊन गेला.