BANDISH

Monday, March 1, 2021

                         


                      अरंगी सूराच्या शोधात

                                                 अंजली मालकर



शास्त्रीय संगीत गायनाचे बाळकडू शब्दशः बाळ असल्यापासून आईने दिल्यामुळे रागदारी ख्याल म्हटल्यावर रागाच्या आलाप, ताना ‘आकारात’ म्हणायच्या असतात हे ‘शास्त्र’ असल्यासारखे ठरलेले असते, असा समज अनेक वर्षे होता. ते का म्हणायचे, कुठे म्हणायचे असे प्रश्नच मुळी मला आणि माझ्याबरोबर गाणं शिकणाऱ्या मैत्रिणींना कधी पडल्याचे आता आठवत नाही. ‘आकारात’ गायचं म्हणजे गायचं ! त्यात माझी आई दट्टा घेऊन माझ्याकडून ते करवून घ्यायची. जेवायला जेवढ्या सहजपणे आपण ‘आ’ करतो, तेवढ्याच सहजपणे मी गातानाही ‘आ’कारात गाऊ लागले. (छोट्या गावांमधून गाणं शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आकारात गाणे खूप अवघड जातं, हे या संदर्भाने मला महत्वाचे वाटते). काही वर्षांनी आकाराच्या बरोबर इकार, उकार, मकार मंडळी देखील महत्वाची असतात आणि ख्याल गायनात पण शब्दांचे नादसौष्ठव पहायचे असते, हे पण कळाले. काही विद्यार्थ्यांना या गोष्टी त्यांच्या गुरूंकडून लहानपणीच कळतात, काहींना त्या उपजत येतात, तर काहींना त्याचा अभ्यास करावा लागतो. माझ्याबाबतीत मात्र गाणं शिकण्याच्या प्रवासात आधी अडखळणे, मग का अडखळले याचा बोध घेणे आणि मग शोध अशी वहिवाट राहिली आहे. हा ‘समज’दार सोबती माझ्याबरोबर सदोदित राहिला आहे.

मध्यंतरी अशीच तारसप्तकातल्या षड्जाला अडखळले. काही केल्या मला हवा तसा तरल, सहज ‘सा’ आकारातून येईना. विनाकारण जोर लावावा लागत आहे, हे जाणवत होते. मी अस्वस्थ झाले. मदतीचे हात होतेच, पण प्रयत्न माझे मलाच करावे लागणार होते. तसे पाहिले तर पुण्याची हवा मला मानवली नव्हती. इथे आल्यापासून सर्दीची त्रैमासिक सभा ठरलेली असायची. शहरातली हवा बदलली की माझा मूड बदलायचा. आभाळात ढग आले की माझ्या मनावर मळभ दाटायचे. हवा पालट, कस्तुरी हुंगणे पासून स्टीरॉइड पर्यंत असे अनेक वर्षे अनेक उपचार केल्यावर निसर्गोपचारातून रामबाण उपाय सापडला. त्यामुळे माझ्या नाक, कान, आणि कपाळाच्या पोकळ्या मोकळ्या झाल्या. अनेक वर्षांनी मी ‘मोकळा श्वास’ अनुभवला. आवाजातील घुमार, हलकेपणा ऐकून मला खूप बरं वाटलं. तरी पण तार षड्जाचा तिढा काही सुटेना. बुद्धी आणि गळ्याचा मेळ काही केल्या जुळेना. ही घालमेल पाहून गुरुजींनी आवाजतंत्राचे तज्ञ श्री राजेंद्र मणेरीकर यांच्या ‘आवाज साधना’ शिबिरात जाण्याचा सल्ला दिला. वर्षभर चालणाऱ्या या अभ्यासक्रमातून, किमान ज्ञानात तरी भर पडेल अशा माफक अपेक्षेने मी प्रवेश घेतला. हा वर्ग त्यांचे शिष्य जयंत केजकर घेणार होते. विषयाचा परिचय व्हावा म्हणून मणेरीकर सरांनी एक प्रस्तावना वर्ग घेतला. नादाचे अरुपत्व, सूर व स्वरातील भेद, आवाजाच्या तंत्र आणि मंत्रातील फरक अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींच्या चर्चेने माझे कुतूहल जागे झाले. वर्गात शिकण्याची प्राथमिक तयारी या चर्चेने पूर्ण झाली. अभ्यासक्रमाला येणारे अनेक विद्यार्थी आणि जयंत सर यांचा माझा तसा जुना परिचय असल्यामुळे वर्गात अनौपचारिक वातावरण होते. आठवड्यातून दोन तास वर्ग चालणार होता.

पहिल्या दिवशी उत्सुक विद्यार्थी- विद्यार्थिनी जयंत गुरुजींसमोर अर्थगोलाकार करून बसले. गुरुजी देखील नव्या मुलांना बघून उत्साहात होते. गाण्याच्या तयारीने आलेल्या विद्यार्थ्यांना पहिला धडा मिळाला तो समस्थितीत उभे राहण्याचा. शरीर संपूर्ण सरळ रेषेत ठेवण्याचा ! गाण्याच्या नादात आपण आपल्या शरीर रचनेकडे किती सहजपणे पाहतो हे या निमित्ताने लक्षात आले. दीड पायावर उभे राहणे, खांदे पाडणे, मान आणि नजर सरळ न ठेवणे, पायात कमी, जास्त अंतर ठेवणे, असे अनेक छोटे मोठे दोष आणि त्यामुळे आवाज निर्मितीमध्ये आलेले दोष देखील व्यवस्थित कळले. नव्या दृष्टीने आता आम्ही शरीर रचनेकडे पाहू लागलो. दोन्ही हात कमरेवर ठेवून ‘विठ्ठल मूर्ती’ होण्यात मजा वाटू लागली. ताणरहित समस्थिती साधल्यावर आवाजनिर्मितीचा अनुभव मिळाला आणि संपूर्ण विचार प्रक्रियाच बदलून गेली. या नंतर गुरुजींनी दुसरा धडा दिला तो जबडा उघडून स्वतःच्या स्वरपात्राची (vocal chords) ओळख करून घेण्याचा. माझा असा लाडका समज होता की मी फार सुंदर आकारात गाते. पण वास्तवात स्वरपात्रातून येणारा आकार आणि नादाच्या निकोपपणात गफलत होत होती. आकाराचीच वेगवेगळी रूपे बघून मी आश्चर्यचकित झाले. स्वरयंत्रापाशी सूराचे आकार, इकार, उकार तयार होताना जबड्याची, जिभेची, दात, हिरड्या आणि ओठांच्या ठेवणीकडे मी आता सजगपणे न्याहाळू लागले.

बुद्धीने एखाद्या आकाराचा विचार करताना, व त्या अमूर्त स्वराकाराला स्वरयंत्रावर ठेवताना त्याच्याशी संबंधित मुखावयवात कसा बदल घडतोय याचा प्रत्यक्ष अनुभव घेताना शरीरातील सगळ्या संवेदना जागृत व्हायच्या. मनावर कुठलाही अनामिक ताण आला की स्वराकारावर नकळत कसा परिणाम होतो आहे, याच्या जाणीवेने मी स्तिमित झाले. अंतर्मनाच्या संवादाचे प्रत्यक्ष दर्शन मुखावाटे येणाऱ्या स्वरातून पाहताना मी आनंदित झाले होते. स्वतःला बघण्याचा आनंद होता तो. सुराला ताकद न लावता, विनासायास मुखातून बाहेर टाकताना येणारी अलवारता निरखताना माझेच मन मोहून जात होते. ज्या तरल नादाची अस्पष्ट प्रतिमा माझ्या मनात होती, ती प्रत्यक्षात साकारताना होताना झालेला स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दापलीकडचा होता. माझ्या सूराबरोबरच दुसऱ्यांचे सूर ऐकताना ते नव्याने समजत होते. सूर लावताना त्याचा भावात्मक विचार( मींड, कण, गमक इ.) न करता तंत्राच्या अंगाने विचार करायला आम्ही आता शिकलो होतो. गळ्यातील सहजनाद ‘आकार’ जेव्हा सरकत सरकत उंच पट्टीत जातो आणि जिभेचा मागचा भाग मागे जाऊन पुढचा भाग खाली ठेवला जातो, तेव्हा त्या नादाला पौर्णिमेची शीतलता लाभते. जयंत गुरुजींनी आकाराबरोबर इकार, उकार, ओकार, मकाराचे घुमारदार उच्चारण करताना केलेली जबड्याची ठेवण, ओठांच्या हालचाली सविस्तर सांगून त्या आमच्याकडून करवून घेतल्या. या स्वरांतून उमटलेले चपटे, गोल, तीक्ष्ण नाद, त्यांच्या संयोगातून झालेल्या लयदार नादरेषा बघताना आमच्यातील शैशव जागे झाले.

स्वरांच्या अभ्यासाबरोबर व्यंजनांचा अभ्यास करताना त्यांना चिकटलेली बाराखडी उच्चारण शास्त्राचा नवा पैलू सांगून गेली. गाताना व्यंजनांचे स्वर वाढवायचे तर व्यंजनांची स्पष्टता संभाषणात कशी प्रभावी ठरते, हे या निमित्ताने समजले. त्यावेळी घुमारदार व्यंजनांचा प्रभावी उपयोग करणारे कुमार गंधर्व आठवले. ‘ह’चा उच्चार करताना व्यंजनात ओलसरपणा कसा ठेवावा हे कुमुदताईंनी सांगितल्याचीही आठवण झाली. वर्षभरात मला या विषयाचा आवाका समजला. त्याचे महत्व, आणि गरज सुद्धा लक्षात आली. प्राचीन काळी यज्ञवेदीसमोर उद्गाता सामाचे गायन करताना उच्चारांच्या बाबतीत दक्ष असे, कारण विशिष्ठ पद्धतीच्या उच्चारणाशिवाय त्या कार्याची फलप्राप्ती होत नसे. हा वर्ग संपल्यावर सहज माझ्या मनात आले की, त्या काळचा फलप्राप्तीचा अर्थ स्वरोच्चारणातून निर्माण होणारी नादवलय तर नसतील !

आवाज साधनेचे तंत्र आणि मंत्र सांगताना श्री राजेंद्र मणेरीकर आणि त्यांचे शिष्य श्री जयंत केजकर आणि श्री सचिन चंद्रात्रे यांनी त्याच्या प्रयोगिकतेवर भर दिला आहे. त्यांनी माझ्यासारख्या अनेक गायकांना बोट धरून हा अनुभव घडवला. आज मी जेव्हा तंबोरा घेऊन गायला बसते आणि आकार लावते, तेव्हा आवाजसाधनेचे धडे डोळ्यापुढे येतात. मी लगेच दक्ष होते आणि रागांच्या अनंतरंगी शिंपल्यातील अरंगी स्वरमोती आपल्याला गवसतो का याचा शोध पुन्हा सुरु करते.

Wednesday, July 1, 2020

नामदेवांचे संगीतशास्त्र

                                              नामदेवांचे संगीतशास्त्र                                                                     अंजली मालकर


महाराष्ट्रातील संतांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असे लक्षात येते की संत नामदेव महाराजांचे वेगळेपण हे त्यांच्या सांगीतिक ज्ञानाचा, त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या उपयोगात दिसून येतो.
ज्ञानदेवांच्या वारकरी संप्रदायाच्या पायाभरणी नंतर सगळ्या वारकरी समाजाला एकत्रित बांधून ठेवायचे नामदेवांचे कार्य संगीताच्या माध्यमातून झाले आहे. नामदेवांनी संगीताचे ज्ञान कुठून मिळवले असा जर शोध घेतला तर असे दिसते की त्या काळात अस्तित्वात असलेल्या गुरुकुल पद्धतीने हे ज्ञान घेतले नसून, समाजात वेगवेगळ्या प्रसंगात गायल्या जाणाऱ्या संगीताचा अभ्यास करून त्यातून संगीताचे ज्ञान संपादन केले व त्याचा समर्पक उपयोग त्यांनी आपल्या कीर्तनात केला. ते विठ्ठल भक्त तर होतेच, पण त्याचा मूळ पिंड गायकाचा होता.

हाती वीणा मुखी हरी| गाये राऊळ भीतरी॥ देह भान विसरला| छंद हरीचा लागला॥

 असे म्हणत गाण्यात तल्लीन झालेल्या नामदेवाचे वर्णन त्यांच्या आणि इतर समकालीन संत मंडळींच्या अभंगातून अनेक ठिकाणी दिसून येते. सगुण भक्तीचा महामेरू असणाऱ्या नामदेवांनी 

 वेद पुराण सासत्र अनंतागीत कबित न गाऊ गो l                                                                              अखंड मंडल निरंकार महि अनहद बेनु बजाऊ गो ll बैरागी रामही गाऊ गो l

 असे म्हणत एखाद्या गानयोग्याप्रमाणे आहत नादातून उत्पन्न झालेल्या स्वरापासून अनाहत नादापर्यंतच्या ध्यानयोगाचा वेध घेतला आहे.                                              सर्व भक्ती संप्रदायांनी सामुहिक उपासना आणि भक्ती प्रसारासाठी प्रभावी माध्यम म्हणून कीर्तनाला अत्युच्च स्थान दिले आहे. कीर्तनात गायन, वादन आणि नृत्य, या तीनही कलांचा उपयोग केला जातो. वाद्यांच्या साथीने गायन आणि भाव समाधीत पोहोचल्यावर सहजगत्या घडणारे नर्तन अशी कीर्तनातली अवस्था नामदेवांनी अनुभवली होती. त्या काळात पं.शारंगधर यांनी संगीत शास्त्रावर  संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी संगीताची परिभाषा गीतं वाद्यं नृत्यं संगीतं इति उच्यते अशी केली आहे. हीच परिभाषा नामदेवांनी हातात वीणा, चिपळ्या, पायात चाळ आणि मुखी अभंग गायन करीत कीर्तनातून लोकजागृतीसाठी वापरली. ते साक्षात संगीत झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.   तत्कालीन संतांच्या रचनांमध्ये बहुत्वाने सापडणारा ओवी छंद, संगीत शास्त्रात प्रबंध म्हणून अंतर्भूत केला गेला होता. ‘रत्नाकराच्या’ प्रबंध अध्यायात सूड, आलि आणि विप्रकीर्ण अशा तीन प्रबंधांचे वर्णन आलेले आहे. त्यातील विप्रकीर्ण प्रबंधात ओवी प्रबंधाचा उल्लेख आढळतो. छंद साधर्म्यामुळे ओवी प्रबंधाचा, अभंग हा सालग प्रबंध मानला गेला. ओवी हा स्वर गेय, तर अभंग हा स्वरतालगेय प्रबंध आहे. अभंगाची मूळ प्रवृत्ती समूह मनाला आवाहन करणारी असल्याने आणि संगीताचा संपूर्ण आविष्कार त्यातून साधला जात असल्यामुळे नामदेवांनी अभंग छंदाचा वापर कीर्तनात केला. नामदेवांचा आवाज अतिशय मृदू आणि भावपूर्ण होता. परिसा भागवताने एका अभंगात वर्णन केले आहे.

दुधावरली साय तेवीवानु काय| तैसे गाणे गाय नामदेवा|                                                                   परिसा म्हणे नाम्या तैसे तुझे गाणे| जैसे का नाणे टाकसाळींचे॥

 प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी देखील नामदेवांच्या रसाळ वाणीचे वर्णन करताना म्हणले,                          भक्तभागवत बहुसाल ऐकिले| बहु होऊनी गेले, होती पुढे|                                                                       परि नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व| हा रस अद्भुत निरपमू ||

नामदेव हे संगीत शास्त्राचे जाणकार होते. संगीत कलेचे मोठे साधक होते, त्यांची संगीत विषयक आपली एक धारणा होती. गायन हे पांडित्य मिळवून लोकांवर छाप पाडत उदरनिर्वाहासाठी नाही हे त्यांच्या दोन अभंगात स्पष्टपणे आढळते.

ताकही पांढरे दूधही पांढरे |चवी जेवणारे जाणविते केळाच्या पाटीवर ठेवला दोडका | तोही म्हणे विका तेणे मोले ढोर म्हणती आम्हां हाकारलास |वारूवा सरसे खाऊ द्या घास

मंदल्या जेती घरोघरी गाती| धृपदासाठी ताक मागती॥ नामा म्हणे सोपी कवित्वे जाली फुका| हरी हरी म्हणता आपुलिया सुखा॥

दुसऱ्या अभंगात ते म्हणतात  

शिकला ते गाणे राग आळवण| लोकांरंजतण करावया॥ भक्तांचे ते गाणे बोबडिया बोली| ते ही श्री विठ्ठल अर्पियेला॥बोबडिया बोली जे कोणी हासती| ते पचिताती रौरवी ॥ नामा म्हणे बहुत बोलो आता काय| विठोबाचे पाय अंतरती

 रागशास्त्र शिकून तयार झालेला अहंकार भक्तिमार्गापासून लोकांना दूर नेतो हे त्यांनी जाणले होते.  गायन, वादन आणि नर्तन या तीनही घटकांचे उत्तम ज्ञान नामदेवांना जरी होते, तरी साध्य कोणते, साधन कोणते या संबंधीची स्पष्टता त्यांना होती .त्यामुळे कीर्तनात त्यांनी योजलेले सांगीतिक घटक आणि त्यांचा भारतीय संगीत परंपरेशी असलेला संबंध त्यांच्या सांगीतिक द्रष्टेपणाची साक्ष देतात.

नामदेव वारकरी पंथाचे पहिले कीर्तनकार.                                              नामदेव वारकरी पंथाचे पहिले कीर्तनकार होते. अठरा पगड जाती जमातीच्या लोकांना एकत्र करून कीर्तनाच्या माध्यमातून समानता, भक्ती, प्रेमाची शिकवण त्यांनी दिली. कीर्तनात संगीताची योजना अशा प्रकारे केली की त्यातून भक्तीचे सामूहिक आवाहन प्रभावी ठरावे. यातूनच वारकरी कीर्तन परंपरा फुलली. संगीताची लगेच आकर्षून घेण्याची शक्ती, त्यातून निर्माण होणारी तल्लीनता आणि जनसामान्यांचा समावेश याची सांगड नामदेवांनी आपल्या कीर्तनातून घातली. त्यासाठी त्यांनी अभंग छंदात रचना केल्या. आधी उल्लेख केला त्याप्रमाणे अभंग हा स्वरतालगेय छंद आहे. साडे तीन ते साडे चार चरणात अभंग गाताना उरलेले अर्धे चरण तालाच्या तोडीसाठी वापरले जाते. एके हाती टाळ एके हाती दिंडी म्हणा वाचे उदंडी राम नाम’ असे म्हणत जेव्हा कीर्तनातले अभंग गायन लयतालात सुरू होतात तेव्हा त्या अनुषंगाने शरीराच्या लयबद्ध हालचाली देखील सुरू होतात. गीत, वाद्य आणि नर्तनाची एकात्मता साधली जाऊन रसरंग निर्माण होतो. प्रेमभक्तीचे सोपे तत्त्वज्ञान नामदेवांनी आपल्या आयुष्यातून घालून दिले, त्यासाठी अभंगातील शब्द हे लोकांच्या तोंडी सहजपणे बसतील असे वापरले.                                                                      वैष्णवाघरी सर्वकाळ|सदा झणझणिती टाळ||  कण्या भाकरीचे खाणे|                                                    गाती रामनाम गाणे|| बैसावयासी कांबळा| द्वारी तुळसी रंगमाळा ||                                                       असे म्हणत गायन, वादनाची भूमिका प्रेमभक्तीच्या साधनेत स्पष्ट केली. ही अभंगे जेव्हा भजन कीर्तनात आबालवृद्ध गात, तेव्हा होणारा भक्तीचा साक्षात्कार विलक्षण असे.  

नामदेवांनी केलेले सांगीतिक बदल                                                                                                      वारकरी कीर्तन प्रकारात नामदेवांनी अनेक सांगीतिक बदल केले. इतर कुठल्याही कीर्तनकाराप्रमाणे नामदेवांना स्वरज्ञान, तालज्ञान आणि रागज्ञान होते. हातात वीणा घेतल्यावर तो स्वरात लावणे, मृदंगाच्या थापेमध्ये असणार्‍या स्वराशी आपला स्वर जुळवणे, नादाची पोत कळणे, अशा गोष्टी नामदेवांच्या अभंगांमधून स्पष्ट होतात.टाळ विणे मृदंग सुस्वर गायन| कोंदले गगन दाही दिशा|’ असे म्हणत नामदेवांनी कीर्तनातल्या संगीताचे सुपरीणाम स्पष्टपणे चित्रित केले आहेत .                सर्व समावेशकता वाढवण्यासाठी नामदेवांनी वारकरी कीर्तनपरंपरेत प्रत्येक व्यक्तीला कीर्तनाचा भाग बनविले. त्यात टाळकरी, गायक वीणेकरी मृदंगमणी यांचा तर प्रत्यक्ष सहवास असायचाच या शिवाय कीर्तनासमोर बसलेला भक्त मेळा हाताने टाळी वाजवून सहभागी व्हायचा. वारकरी कीर्तनात गायनापेक्षा भजनाला प्राधान्य दिले गेले. भजनचा उल्लेख संगीत शास्त्रात रंजकतेने राग आळवणे असा दिला आहे. त्यामुळे वारकरी कीर्तनात संपूर्ण कीर्तनभर भजनाची सूक्ष्म प्रक्रिया सुरु ठेऊन नामदेवांनी संगीताचा वेगळा विचार मांडला. त्यासाठी कीर्तनकाराच्या मागे दहा- वीस टाळकरी उभे केले. संगीतातून सर्वसमावेशकता अशी वेगळी उभारणी नामदेवांनी केली. भजनात मूळ स्वर पक्का लागतो. गायन कुठल्याही स्वरात गेले तरी मूळ स्वर सुटू नये म्हणून वीणेचे प्रयोजन निर्माण झाले. वीणा आणि मृदंग एका स्वरात जुळले कि मूळ स्वराच्या नादातून निर्माण होणारा रसरंग कीर्तन करणारे, ऐकणारे अनुभवत. गाता गाता बोलणे, बोलता बोलता गाणे, असा आधीच प्रचलित असलेली पद्धत नामदेवांनी वारकरी कीर्तनातही घेतली. यालाच निरुपण म्हटले गेले.                                कीर्तनातील नामगजराची कल्पना नामदेवांचीच. चढत्या आणि उतरत्या स्वरांच्या योगाने असणार्‍या नामगजराचे मूळ, रागसंगीतातील जाती गायनातून आले आहे. नामदेवांच्या काळात विठोबा रखुमाईचा नामगजर होता. एकेक स्वर चढवणे आणि येताना स्वर संवाद साधत परत मूळ स्वरावर येणे यातून आपल्या आवाजाचा आवाका कळणे, व स्वरांमधील संवाद तत्त्वाचा वापर दिसून येतो. याच पद्धतीने पुढे तुकाराम महाराजांनी जय जय राम कृष्ण हरीचा गजर वारकरी कीर्तनात रूढ केला.

 कीर्तनकार, वीणेकरी, मृदंगी आणि टाळकरी असलेली ही कीर्तन पद्धती सामगायनाच्या पद्धतीशी साधर्म्य राखते. साम पद्धतीत प्रस्तोता किंवा उद्गाता सर्वप्रथम गायल्यावर इतर त्यांच्या मागे गातात. वारकरी कीर्तनातही कीर्तनकार किंवा वीणेकरी अभंगाचे ध्रुवपद गायल्यावर त्याचे अनुकरण इतर टाळकरी करतात. कीर्तनाच्या प्रस्तुतीकरणातदेखील सामूहिकतेचे भान ठेवत नामदेवांनी अनेक पद्धती सुरू केल्या. दहा ते बारा टाळकर्‍यांचा समावेश त्यांनी वारकरी कीर्तनात केला. कीर्तन करताना कीर्तनकाराजवळ वीणेकरी आणि मृदंगी उभे राहिल्यामुळे मृदंग आणि वीणेचा स्वर कीर्तनकाराला सतत मिळणे, त्यामुळे प्रमाण चालीचे निरूपण करतानाही नामगजर म्हणण्यात सूर सापडायला सोपे गेले .कीर्तनकाराच्या उजव्या आणि डाव्या अंगाला टाळकरी मागे उभे राहिल्यामुळे टाळांच्या नाद लयीने बसलेल्या वारकर्‍यांमध्ये चैतन्य निर्माण होते.                                                कीर्तनकाराच्या मागे जेव्हा सर्व वारकरी गातात तेव्हा त्यांना सूर, लय टाळामधून मिळतो. कीर्तनकारांनी ठाय धुमाळीत सुरु केलेला अभंग संपल्यानंतर गजरात टाळकरी लय वाढवतात. श्रोत्यांची उत्कंठा वाढे पर्यंत हा गजर द्रुत लयीत उंच पट्टीपर्यंत  गायला जातो. त्यानंतर मृदंगावर तोड घेऊन विठ्ठल जयजयकारात स्वर आणि ताल परत मूळ स्वर लयीवर येतात. या नंतर कीर्तनकार दुसऱ्या अभंगाला सुरुवात करतो.आधी अभंग मग निरूपण अशा क्रमवारीत कीर्तन चालू असताना मध्येच विठ्ठल विठ्ठलचा गजर पहिल्या स्वरावर करून सप्तकाचा पहिला सूर कीर्तनकाराला पुरवला जातो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल तार सप्तकाच्या पहिल्या स्वराला म्हणून मध्यस्वर आणि तार सप्तकाचा संवाद दाखवला जातो. आजच्या वारकरी कीर्तनात काळाच्या ओघात जरी अनेक बदल झाले तरी सर्वसमावेशक गायन पद्धतीतून नादब्रम्ह उभा करणे, याची अनुभूती नामदेवी कीर्तन पद्धतीतून येणे हे नामदेवांना अपेक्षित होते. नामदेव स्वतःच्या गायनाविषयी म्हणतात

प्रेम पिसे भरले अंगी | गीते छंदे नाचो रंगी ||कोण वेळे काय गाणे| हे तो भगवंता मी नेणें || वारा धावे भलतेया | तैसी माझी रंगछाया || टाळ मृदंग दक्षिणेकडे | आम्ही गातो पश्चिमेकडे || बोले बाळक बोबडे | तरी ते जननीये आवडे || नामा म्हणे बा केशवा | जन्मोजन्मी देई सेवा ||

 सकृत दर्शनी त्यांनी प्रचलित राग संगीताच्या प्रस्तुतीकरणाविषयी अनभिज्ञता दर्शवली असली तरी संगीताचे मर्म, प्रयोजन त्यांनी जाणले होते. प्रचलित गायन पद्धतीचा अभ्यास करून आवश्यक तेवढे आत्मसात करून, नसलेले तयार करण्याची सांगीतिक प्रतिभा त्यांच्यात दिसून येते. नागर संगीताचा जरी त्यांनी स्वीकार केला नसला तरी त्याकाळातले त्यांच्या आजूबाजूचे सांगीतिक वातावरण बघता त्यांनी अभंग गायनात देशी रागांचा वापर केलेला असावा.  

नामदेवांचे तालशास्त्र

तालासंदर्भात ही नामदेवांची कल्पकता दिसून येते. चार/चार मात्रेच्या छंदाला त्यांनी

 धींऽत धिंऽ|धाधातिंऽ| तिरकिट धिन| धागे तिरकिट असे संपूर्ण तालाचे ज्याला ठाय धुमाळी म्हणतात, असे रुप दिले. अभंग सादर करताना ताल दुगुनीत जाऊन, त्याची तोड होऊन परत मूळ लयीत वाजवताना लयीचे वैविध्य साधले जाणे, यात देखील त्यांनी पारंपरिक संगीतशास्त्रातून नवनिर्मिती केल्याचे दिसून येते.                                                                                                                   ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर नामदेवांनी महाराष्ट्र सोडला आणि वीस वर्षे पंजाबमधील घुमान गावी ते राहिले. त्यांनी तिथल्या भाषा, वेषाबरोबर संगीतसुद्धा आत्मसात केले. नानकसाहेबांच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये नामदेवांचे ६२ सबद, म्हणजेच अभंग रागा, तालाबरोबर उधृत केलेले आपल्याला दिसतात. भैरव, मारूषभाईचा कल्याण, सारंग, धनश्री. सोरठी, आसा, टोडी अशा रागांचे नावे त्यांच्या सबदांवर सापडतात. ही नावे जरी शे-दोनशे वर्षांनंतर लिहिली गेली, तरी मौखिक परंपरेने आलेली राग परंपरा लिहिण्याची पद्धत त्यावेळपर्यंत नव्हती. ती नंतर आली. असा निष्कर्ष निघू शकतो. संगीतासारख्या श्राव्य कलेचा मागोवा घेण्यासाठी मौखिक परंपरेचा अभ्यास येथे अनिवार्य ठरतो. जसे मंदिराचा बाह्य आकार बदलला तरी गाभारा बदलत नाही. त्याचप्रमाणे काळाच्या ओघात स्वरस्थाने, तालाक्षरे, प्रस्तुतीकरणाची बाह्य स्वरूपे बदलत गेली तरी नामदेवांनी आपल्या कीर्तनपद्धतीत वापरलेल्या सांगीतिक संकल्पना एका गायकाच्या भूमिकेतून लोककल्याणाचे कार्य करणाऱ्या ठरतात, म्हणूनच त्यांच्या ध्येयाशी त्या सुसंगत वाटतात.                                                                          गाऊ नाचू आम्ही आनंदे कीर्तनीभुक्ती मुक्ती दोन्ही मागो देवा॥                             असे आपल्या अभंगात लिहून त्यांनी त्यांच्या लेखी संगीताला दिलेले अत्युच्च स्थान अधोरेखित केले आहे .

 




Sunday, April 15, 2018

बबनराव हळदणकर नावाचे गाणारं झाड




           बबनराव हळदणकर नावाचे गाणारं झाड

                                                अंजली मालकर

‘श्री’ रागाचा अभ्यास करण्यासाठी यु ट्यूबवर मी वेगवेगळ्या गायकांचे ‘श्री’ ऐकत होते. त्यात बबनराव हळदणकरांचा ‘श्री’ पण होता. बुजुर्ग गवयाच्या गाण्यात पारंपारिक विचार मिळत असल्यामुळे मी त्यांचा राग ऐकू लागले आणि ऐकतच राहिले. स्वर कोणते आहेत यापेक्षा कसे आहेत याकडे माझे लक्ष वेधले गेले. गाण्यात ताजेपणा होता. स्वर सांडत सांडत भरलेला रागरंग, शब्दांचे लडिवाळ उच्चारण लयीबरोबर येताना मान आणि मन डोलायला लावत होता. तीहायांच्या फैरी बुचकळ्यात टाकू लागल्या. सूर तालाच्या पुढचे बोलणे, ज्याला ढंग म्हणतात तो मला त्यात दिसला. त्या ओबडधोबड वाटणाऱ्या शब्दोच्चारातला गोडवा कळाला आणि मनोमन त्यांना वंदन केले. आज त्यांचे देहावसान झाल्याचे कळल्यावर माझी त्यांची ही पहिली भेट आठवली आणि डोळे आदराने लवले.
बबनराव हळदणकर आणि आग्रा घराणे असे समीकरण शास्त्रीय संगीत समजणाऱ्या प्रत्येकाला माहित होते. आयुष्यभर बोलबांट, लोचदार लयकारी, तिहाया यांचे बोट धरून ते फिरले आणि शेवटी गायन कलेच्या अथांग अवकाशात नादरूप झाले. आग्रा घराण्याच्या भव्यतेचा, बोल अंगाचा, ढंगाचा, रागांच्या स्वरलगावांचा, अक्षर आणि स्वरनादाचा सूक्ष्म विचार मांडत मांडत ते घराण्याच्या चौकटीला ओलांडून पुढे गेले. समर्पित कलाकाराला येणारा ऐटदार शेवट त्यांच्याही वाट्याला आला. ते वयाच्या ८९ व्या वर्षी शेवटपर्यंत जोमाने गात दुसऱ्या जगाच्या स्वरमंचावर गाण्यासाठी निघून गेले.
‘मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो’ या बोरकरांच्या ओळी सार्थ करणारे जीवन बबनराव जगले. त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक कलाकारांना नि:स्वार्थपणे काही ना काही दिल्याने त्यांचे गुरुपण सार्थ ठरले. गुरुपणाचा एक नवा आदर्श ठेवून ते गेले.
खरंतर माझी आणि त्यांची प्रत्यक्षात तीन, चारदाच भेट झाली असेल, पण प्रत्येक भेटीत त्यांचे चैतन्यतत्व मला विस्मित करून गेले. त्यांनी लिहिलेली पुस्तके मी वाचली आहेत. त्यांच्या बंदिशी पण ऐकल्या आहेत. पण या सगळ्यापेक्षा त्यांच्या व्यक्तीमत्वातली चुंबकीय शक्ती फार मोठी वाटली. चेहऱ्यावरचे निखळ हास्य, जगण्यातला आनंद दाखवणारे चमकदार डोळे आणि कोणालाही कधीही शिकवण्याची तयारी असलेले उदार मन, एखाद्या नवागताला सुद्धा मोहून टाकायचे. मला मोठ्या कलाकारांशी बोलायला नेहमीच दडपण वाटते. काही वर्षांपूर्वी असेच एकदा ते एका परिचितांकडे भेटले. मी गाते म्हटल्यावर त्यांनी प्रेमाने विचारपूस केली. खूप वेळ गेल्यावर मी भीत भीत मला बंदिश शिकवाल का, असे म्हटल्यावर ‘अगं आधी का नाही सांगायचं’ असे म्हणून मला मोकळं केलेला तो प्रसंग अजूनही स्मरणात आहे.
बबनरावांच्या दातृत्वामध्ये सहजपणा होता. त्यांचे मन निर्लोभी होते. त्यामुळे लोकांना ज्ञान देऊन आपण फार मोठे काम करतोय असा भाव कुठेही न येता उलट हे माझे कामच आहे, असा जबाबदारीचा भाव असे. दुर्मिळ होत चाललेल्या पितृत्वभावनेची ही ओली निशाणी आजच्या काळात फार कमी जणांकडे दिसून येते. गाणं शिकवायला जायचंय म्हटल्यावर कोणाही बरोबर कुठल्याही वाहनावर बसून जाण्यासाठी लागणारा त्यांचा निर्व्याज उत्साह या जगातला वाटायचा नाही. एखादा गायक चांगला गाणारा असेल आणि नम्र असेल तर तो कोणाचाही शागीर्द असला तरी त्याला विद्या शिकवण्याची तयारी दाखवणाऱ्या जुन्या काळातील गुरूंच्या पंक्तीत बबनराव आता जाऊन बसले आहेत. त्यांनी आपल्या शिष्यांना तर पुत्रवत शिकवलेच पण इतरांनाही तेवढ्याच तळमळीने शिकवून शास्त्रीय संगीत परंपरेतल्या काही सुंदर मूल्यांचा मान राखला. कलेच्या अवघड वाटेवरून चालताना दमलेल्या कलासाधकांसाठी ते विश्रांतीची जागा झाले. त्यांच्या प्रेमळ सावलीत ताजेतवाने होऊन अनेक गायक जोमाने पुढे गेलेले काळाने पहिले आहे. आपल्याकडून उर्जा घेऊन नवीन बिऱ्हाड थाटणाऱ्या गवयाचे कृतकृत्य होऊन कौतुक करण्याचा दुर्मिळातला दुर्मिळ गुण त्यांच्याकडे होता.
कलेच्या साधनेमध्ये दोन प्रकारचे साधक आढळतात. पहिली जी कलेची साधना करत एकटेच इतके दूर जातात की त्यांची समाजाशी असलेली नाळ गळून जाते. त्यांचे तेज सूर्यासारखे प्रखर असते. कधी कधी असह्य देखील. दुसऱ्या प्रकारचे साधक समाजामध्ये राहून इतरांनी आपल्याबरोबर थोडं चालावं म्हणून स्वतःची गती थोडी कमी करतात. त्यांचं चांदणं सौम्य आणि सुखकारक असतं. बबनराव हे दुसऱ्या प्रकारात मोडणारे कलासाधक होते. त्यांना पार कळला होता पण मायेच्या ममतेने इतरांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांना अधिक आनंद होता. त्यामुळे नवीन मुलांबद्दल बोटं न मोडता कोणाच्याही कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या योग्य गुणांची प्रशंसा करणे आणि काय कमी आहे हे दाखवण्याचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याची निष्ठा त्यांनी प्रामाणिकपणे बजावली.
अशातच त्यांची मैफल ऐकण्याचा योग आला होता. तरुणांनाही लाजवेल असा सळसळता उत्साह, भक्कम बैठक आणि साध्या साध्या रागातील स्वरांचे ठेहराव बदलून केलेल्या विलक्षण स्वरसंगतीने दोन अडीच तास कसे गेले ते कळलेच नाही. एखाद्या रागाचे सागरत्व काय असते याचा अनुभव घेताना सूर, बेसूर, कणसूर या व्याख्या देखील कचकड्याच्या वाटू लागल्या. गाणं म्हणण्याचा जसा रियाज असतो तसेच गाणं ऐकण्याचा देखील रियाज असतो, या वाक्याचे शंभर टक्के प्रत्यंतर त्या दिवशी आले. मैफल संपल्यावर औपचारिक बोलण्याने स्वरलयशब्दांचे सुंदर स्वप्न भंगून जाईल, अशी भीती वाटून गेल्याचेही मला चांगलेच आठवते.

बबनराव हळदणकर नावाचे विशुद्ध संगीत आता पुढच्या मैफलीसाठी आपल्यातून गेले आहे. त्यांनी अत्यंत डोळसपणे, प्रसंगी बंड पुकारून शास्त्रीय संगीत अधिकाधिक मोकळं करायचा प्रयत्न केला. आग्रा गायकी अधिक रसदार करण्यात या ‘रसपिया’ने आपले आयुष्य समर्पित केले. अपरिचित रागांना लोकांजवळ नेऊन त्यांची तोंडओळख करून दिली. काही रागांचे प्रमाणीकरण करून छोट्यांची भांडणे मिटवण्याचा वडीलधारी प्रयत्न पण केला. माणसात रमलेला माणूस उठून गेला की त्याची जागा रिकामी होते. तो कधी ना कधी उठून जाणारच असतो. ती जागा रिकामी होणारच असते. पण बबनरावांसारखे वडाचे झाड उन्मळून पडले तरी त्यांच्या पारंब्यांचे नवे वटवृक्ष तयार होणार असतात. अशा पारंब्या जर वटवृक्षासारख्या झाल्या तर त्यांच्या खाली आश्रयाला येणारे नवे वाटसरू निवांत होतात. अशीच ही कला आणि सत्प्रवृत्तीची परंपरा निरलसपणे वाहती राहते....