Thursday, April 6, 2017

शोध एका जिप्सी स्वराचा ..........




                              
                                
शोध एका जिप्सी स्वराचा ..........
                                                    अंजली मालकर


भारतीय संगीताच्या निरंतर प्रवाहात असे काही कलाकार होतात जे ‘मार्गी’ असतात. नवीन मार्गाचा शोध घेत, प्रचलित क्षितिजे विस्तारण्याचे काम करतात. संगीताच्या स्वर,लय,शब्द या मूळ घटकांकडे पुन्हा नव्याने पहात एका अर्थाने परंपरेचा वसा पुढे चालवत असतात. किशोरी आमोणकर हे या मार्गी कलाकारांमधले ठळक नाव होते. माझ्यापुरते बोलायचे तर ‘किशोरीताई’ या fatal attraction चा शोध अपूर्ण राहणार याची चुटपूट मनात कायमची राहणार असे वाटून गेले. त्यांच्या स्मरणरंजनात राहताना आठवले ते पोथीनिष्ठ तरुण मनावर पडलेले भूप, बागेश्री आणि जौनपुरीचे आव्हानात्मक ठसे. त्या अबोध वयातही ‘बाजे झनन’ मधला आवेग स्पर्शून गेला होता. ‘छननन बिछुवा’ मधला खनकदारपणा त्यावेळी भलताच आवडून गेला होता. गाणे शोधण्याच्या प्रवासात मला किशोरीताई नावाचे वादळ कळत्या वयातच भेटले. अनेक थोरामोठ्यांच्या उंचावलेल्या भुवया, तटस्थ आवाज झेलीत छातीठोकपणे उभे ठाकलेले वादळ ! चौकटीतले प्रश्न सोडवण्यात गुंतले  असल्यामुळे, या चौकटीबाहेरच्या प्रश्नाला तेव्हा वैकल्पिक म्हणून सोडून दिले होते. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात त्याच्याकडे पाहता येईल म्हणून त्यांच्या विचारांना तेव्हा बाजूला ठेवले होते. पण या विचारांनी परत परत धडका देऊन, असे फार काळ बाजूला ठेवता येणार नाही अशी तंबीच मला तेव्हा दिली होती. शास्त्राला वाकवत, कधी झुगारत, तर कधी कधी त्याच्याशी दोन हात करत, त्याचेच तत्व त्याच्या गळ्यात टाकण्याचा ताईंचा बेधडकपणा समजून घेण्याची माझ्या कलामनाची कुवत एकीकडे वाढवत असताना दुसरीकडे स्वतःच्या अनुभवाशी एकनिष्ठ राहून तर्क आणि विवेकाचा काटा तोलत होते.....

वेळ सकाळची. टिळकस्मारक मध्ये किशोरीताई गाणार होत्या. हॉल संपूर्ण भरलेला होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. टाळ्यांच्या कडकडाटात ताई स्वरमंचावर बसल्या. त्यांनी हातात स्वरमंडळ घेतले, डोळे मिटले आणि तोडीच्या स्वरांनी रंग भरायला सुरुवात केली. बराच वेळ षड्जाभोवती घुटमळत त्यांनी कोमल रिषभ लावला, आणि रसिकांची कुजबुज सुरु झाली. माझ्या शेजारच्याने त्वरित कोमल रिषभ ‘चढा’ लागलाय असा निर्वाळा देऊन टाकला. माझ्या तोपर्यंतच्या स्वरानुभावानुसार तो रिषभ चढाचहोता. त्या दिवशी ताईंनी संपूर्ण मैफल त्या ‘चढ्या’ रिषभाने रंगवली. कार्यक्रम संपल्यावर मी विचार करू लागले तर जाणवले ते संपूर्ण रागभर राखलेले ‘चढा’ रिषभाचे स्थान, त्याला वापरून केलेल्या विलक्षण स्वरसंगती आणि गवताच्या पात्यासारखे लवलवित स्वर ! तो राग त्यादिवशी माझ्या डोळ्यात अंजन घालून गेला. त्या कार्यक्रमानंतर त्यांचा तोडी अनेकवेळा ऐकायला मिळाला. पण त्या दिवशीच्या तोडीने कला, कलाकार आणि परंपरा यावर जे भाष्य केले, त्याने माझी रागरसास्वादाची अनेक कवाडे उघडली. संगीतासारख्या श्राव्य कलापरंपरा कालप्रवाहात वाहताना एखाद्या महानदी सारख्या आपला प्रवाह बदलता ठेवत असतात. त्यात रागातल्या स्वरांच्या श्रुतींचे थांबेदेखील काळाच्या प्रवाहात बदलतात. काल ज्या श्रुतीचा थांबा स्वर झाला असतो, तो कदाचित आज नसतो. उद्या अजून वेगळाच असू शकेल. इतक्या सूक्ष्म पातळीवर चाललेल्या श्रुतींच्या भरती, ओहोटीवर आपली हुकुमत ठेवणे अशक्यच ! त्यामुळे त्याक्षणी कलाकाराच्या सृजनपटलावर स्वराची कुठली ‘कला’ उमटेल आणि ती ‘कला’ घेऊन तो कलाकार रागाच्या किती कॅलिडीओस्कोपिक सौंदर्याकृती निर्माण करून त्याचे भावबंध रसिकांपर्यंत पोहोचवतो हीच त्याची कामगिरी !

जन्माच्या आधीपासून गाण्यात बुडालेल्या किशोरीताईंना त्यांच्या घराण्याच्या पारंपारिक ज्ञानाचे आकलन खूप लवकर झाले. घरातून मिळालेली गाण्याची सौंदर्य खाण आणि त्याच्याविषयी बाहेरच्या जगात असलेली उदासीनता, अज्ञान यातून त्यांच्यातला कलाकार डिवचला गेला असावा आणि जे हाती घेईन ते सुंदर करून ठेवीन या मनस्वी आवेगाने त्यांनी मुळातून काम सुरु केले. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे गायन परंपरांचे पुनरावलोकन त्या करू लागल्या. भरताच्या नाट्यशास्त्रापासून जगन्नाथ पंडिताच्या रसगंगाधरापर्यंत अनेक रसशास्त्र, नाट्य, काव्य ग्रंथांचे वाचन मनन, चिंतन करण्याच्या ओघात संगीतातील प्राणघटक ‘स्वर’ याचे दर्शन त्यांना घडले. स्वयंप्रकाशी उर्जा जेव्हा कंठातून उमलते, तेव्हा तिचा असर स्वतःसह सर्वांना आपल्याकडे ओढून नेतो याची जाणीव किशोरीताईंना याच दरम्यान झाली असणार. त्यानंतर त्या असराचा शोध घेण्यासाठी त्यांचे मन जिप्सी झाले. त्याच्या शोधात व्याकूळ झाले. ही विरहदग्धता जेव्हा स्वररूपाने प्रस्फुटीत झाली, तेव्हा रागरूपाची मानवी बंधने गळून पडली. कधी ती झुगारली देखील गेली ! हा स्वरकृष्ण एकांतात भेटू शकतो असे वाटल्यामुळे चिंतन, मनननाने एकांतिक झालेल्या किशोरीताई अधिकाधिक आपल्याआपल्यात राहू लागल्या. ‘भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ अशी अवस्था त्यांची झाली असणार. एकीकडे या स्वयंप्रकाशी उर्जेचे गुपित रसिकांना सांगण्याची तळमळ, तर दुसरीकडे ती निसटून जाईल म्हणून जगाला पाठ करून त्याच्या मागे धावण्याचा आवेग, अशा द्वंद्वात सापडलेले त्यांचे कलामन मला त्यांच्या कलाविचाराचा मागोवा घेताना दिसू लागले. अर्जुनाला बाण मारताना झाडावरल्या पक्षाचा फक्त डोळाच जसा दिसत होता, त्याप्रमाणे किशोरीताईंना केवळ ‘स्वरत्व’ दिसू लागले होते. स्वरातली लय, शब्दातील स्वरत्व, त्याची व्याप्ती, स्वरभाव, त्याचा प्रभाव यांच्या अस्पष्ट जाणीव त्यांना अस्वस्थ करू लागल्या. त्या ‘स्वराला’ सखा बनवण्यासाठी धडपडत होत्या. त्यामुळे व्यावहारिक जगातले विसंगत आयुष्य त्या जगत असतानाही या विसंगतीकडे डोळेझाक करून त्यांच्या स्वरामृताला प्राशन करण्यास उत्सुक असलेला रसिकवर्ग सदोदित त्यांच्या मैफलीला हजर असायचा. स्वरसख्याबरोबर राहताना त्यांचा स्वरभाव कधी आरक्त राधेचा होई तर कधी विरागी मीरेचा ! त्यांचे गाणे मानवीय होते. मनुष्याच्या अनंत रंगात रंगलेले त्यांचे स्वर त्यांच्या जीवनदर्शनाचा मोठा भाग व्यापून होते.

सृजनशील कलाकार ही मोठी बेटं असतात. किनाऱ्यावर उभे असणाऱ्या लोकांना ती स्वतःकडे खेचून घेतात. त्यांच्यावरील सौंदर्यशोभा पाहणाऱ्याला नेत्रसुख आणि चित्तशांती देतात. पण जर त्या बेटाच्या जवळ गेलात तर तुमचे स्वागतच होईल असे नाही. ते जरी अंगाखांद्यावर वृक्ष, वेली, झुडुपं खेळवत असली तरी एका क्षणी ते बेट कोणाचेच नसते. ते केवळ स्वतःचेच असते. त्याची सुखदुःख त्याचीच असतात. ती इतर कोणाची नसतात, होऊ शकत नाहीत. किशोरीताई देखील अशाच एक बेट होत्या. जगात असताना रागांचे रागत्व स्वरांमधून शोधत त्या फिरल्या. आता उरलेला शोध त्या दुसऱ्या जगाच्या  मैफलीत घेतील. दात्याने दिलेला प्रत्येक श्वास त्यांनी स्वरध्यासासाठी खर्च करून त्यांच्या जीवनाची मैफिल रंगवली. आता त्या आयुष्याच्या प्रबंधाचा आभोग पूर्ण करून संगीताच्या आकाशात ‘ध्रुव’ झाल्या आहेत. या धृवाकडे बघून आता मागून येणाऱ्या वाटसरूंना पुढची वाट दिसेल. 





Tuesday, March 7, 2017

शुद्धकल्याणच्या निमित्ताने




             शुद्धकल्याणच्या निमित्ताने .......

                                    अंजली मालकर


कलेचे प्रवाहित्व हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण मानले गेले आहे. शतकानुशतकाच्या वाहण्यात त्यातल्या काही गोष्टी बदलतात, काही पुढे प्रवाहित होतात. संगीतकला विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीतासारख्या कलेमध्ये, ज्यात पारंपारिक कला सौंदर्याची गृहीतके असोशीने सांभाळली जातात, नव्हे मिरवली जातात, त्यात बदलाचा स्वीकार जरा उशीराच होतो. काळाच्या प्रवाहात रागरूपे बदलतात, प्रस्तुतीकरण बदलतात, कधी कधी कलेची उद्दिष्टे देखील थोड्याफार फरकाने बदलतात. पण सूर लयीची चिरंतन मुल्ये अबाधित रहातात, रहात आली आहेत. सूर लयीशी एकरूपत्व हे पूर्वीसुद्धा आणि आजही कलेचे सर्वश्रेष्ठ ध्येय मानले गेले आहे. परवा कृष्णाजी गाडगीळ स्मृती सभेत पं. विकास कशाळकर यांनी गायलेला शुद्धकल्याण अशीच चिरंतन संगीतमुल्ये दाखवून गेला.
कशाळकर सर माझे गुरु. एखाद्या शिष्याने गुरूविषयी काय बोलावे? जवळच्या माणसाविषयी बोलणे खरंतर अवघडच नव्हे अशक्यच असते. सरांच्या या आधी अनेक मैफली मी ऐकल्या आहेत. तरीपण गुरूच्या गायनाचे परिपक्व दर्शन आणि शिष्याच्या संगीत आकलनाचा परिपक्व टप्पा म्हणून या सभेतल्या शुद्धकल्याणाकडे  मला पहावेसे वाटले. त्यांनी गायलेल्या शुद्धकल्याणने शास्त्रीय संगीतातील मला माहित असलेल्या काही पारंपारिक मूल्यांना प्रश्न विचारले. मैफिल मारणारे गवयी म्हणून सरांचा लौकिक नाही, पण शास्त्रशुद्ध, प्रयोगशील, अभ्यासू कलाकार म्हणून शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांचे नाव आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गायनाने माझ्या संगीत चिंतनाला परत मुळाकडे नेले.
शास्त्रीय संगीतात घराणेदार गायनासाठी भरदार, पल्लेदार आवाजच लागतो, नाहीतर ते सुगम संगीत होते या माझ्या पहिल्या गृहितकाला त्यांनी छेद दिला. सरांचा आवाज पातळ आणि मर्यादित पल्ल्याचा. पण जेव्हा या गृहितकाला बाजूला सारून त्यांच्या आवाजात डोकावले तर जाणवली ती आवाजाची पारदर्शक, हलक्या जवारीची नाजूक स्थिरता ! साबणाच्या पाण्याचा मोठा बुडबुडा अलगद हातावर स्थिरावावा इतका अलवारपणा. मग मी अजून आत शिरले, तेव्हा दिसले सौम्य, मधुर विशुद्ध सूर ! एरवी अनेकवेळा आपला मुद्दा पटवण्याच्या नादात स्वरांवर अवाजवी दाब दिला जातो, विनाकारण आवाज मोठा होतो. अहंकाराची छोटी खेळीच असते ती. पण इथे जाणवला तो सुरेल तंबोऱ्याला समर्पित सहज सूर. शुद्धकल्याण मध्ये षड्जावरून धैवताकडे जाताना लागणारा निषाद, आणि पंचमाकडून गांधाराकडे जाताना लागणारा तीव्र मध्यम, पक्ष्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर  बसताना हलकेच उतरावे असा होता. ते उतरणे इतके हलके, की मला वाटले हा स्वरपक्षी फांदी चुकणार. बसताना देखील कुठे धडपड नाही, अंदाज चुकण्याचा संदेह नाही. त्या अलगदपणाने शास्त्रीय संगीतातील माझ्या ठोसपणाच्या गृहितकाला दुसरा धक्का दिला. शुद्धकल्याणची ही सात्विक सुंदर शीतल आभा, पूर्णचंद्रासारखी मैफिल भर पसरली होती. तिलवाड्याचा ठेका सुरु झाल्यावर स्वरलयीचे नक्षीकाम सुरु झाले. रागवाक्य छोटी होती, पण फेड आउट आणि फेड इन मुळे ती तंबोऱ्यात मिसळून त्यांना दिर्घत्व मिळत होते. लहान श्वासात इतकं सहजपणे मांडणे, ते ही कुठलीही ओढाताण स्वतःला आणि इतरांना न जाणवता, म्हणजे मनाच्या स्थैर्याची केवढी मशागत असणार ! गाताना सर दोन रागवाक्यांमध्ये अवकाश ठेवत होते. कधी एका मात्रेचा तर कधी दोन मात्रेचा अवकाश. एक वाक्य संपल्यावर दुसरे वाक्य टाकायच्या मधला अवकाश असा काही तोलत होते की जसं काही अवकाश पेरत त्यांची आवर्तनाची कशिदाकारी चालली आहे. तंबोऱ्याला लगडलेले शुद्धकल्याणचे सूर आणि लयीला बिलगलेल्या रागवाक्याने सगळेच जण ‘प्रवाहपतित’ झाले होते.
शब्द, हे शास्त्रीय संगीतात स्वर टांगायच्या खुंट्या आहेत किंवा अडगळ असतात अशी धारणा असणारे बरेच गायक आहेत. माझी अशी धारणा नसली तरी शास्त्रीय संगीत हे सुराधीष्ठितत संगीत असल्यामुळे शब्दांवर विशेष मेहनत घ्यायची गरज नसते या गृहितकाला देखील शुद्धकल्याणने छेद दिला. व्यंजनांच्या शेवटी येणाऱ्या आकार, इकार, उकार आणि मकार यांना श्वासाच्या नियंत्रित दाबाने फुलवले तर त्यांची प्रभा किती उल्हासित करू शकते याची प्रचीती सरांच्या शुदकल्याणने तेव्हा दिली. कधी इकाराच्या चपटेपणाला धारदार करीत, कधी उकारात स्वरांची भेंडोळी सोडत, ‘न’ कारात नाकाचा संयमित वापर करीत त्यांनी या अमूर्त नादाकृती अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण केल्या. एका लयीत धावणाऱ्या घोडागाडीत बसल्यावर जी एकतानता जाणवते, ती, सरांच्या बोलताना आणि ताना ऐकताना तिथे जमलेल्या श्रोत्यांना लागली होती. मधाळ आलापी नंतर सुखावह वाटेल इतकाच जोर देत गमक आणि आघातांच्या तानलडी बरसत होत्या. अनेकवेळेला अवाजवी पुरुषी आक्रमकता दाखवण्यासाठी अंगावर धावून येणाऱ्या किंवा डोक्याला मुंग्या येतील इतक्या खाली वर ताना घेणाऱ्या अनेक गायकांच्या तुलनेत या ताना अंगभर मोरपीस फिरवून गेल्या. माझ्या मनाची तृप्ती झाल्यामुळे माझ्यासाठी ही मैफल इथेच संपली होती. खरतर कुठल्याही मैफिलीचे यश हे केवळ कलाकारच नाही तर रसिकांवर देखील अवलंबून असते. भिंग लावून चुका काढण्यापेक्षा, रसिकांचे मनाचे औदार्य, सहिष्णुता कलाकाराची कला आणि कलाकार या दोघांना वेगळ्या उंचीवर नेते. याचाही अनुभव या मैफिलीच्या निमित्ताने आला. मोठमोठ्या समारोहामध्ये भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी श्रोत्यांना न बघता छोट्या बैठकांमध्ये रसिकांच्या नजरेला नजर देऊन पावती मिळवणाऱ्या मैफिलींची रंगत या सभेत  शुद्धकल्याणने आणली. गाणं कुठल्या घराण्याचे होते, किती कौशल्यपूर्ण होते, शास्त्रीय कसोट्यामध्ये किती बरोबर होते, यापेक्षा विचारांचा एकजिनसीपणा, कल्पकता यातून निर्माण होणारा प्रवाह या रागाने मला दाखवला. त्यातील मानवीयता मला अधिक व्यापक आणि उदार बनवून गेली. प्रवाहात गाण्याचे आणि जीवनाचे देखील सार दडले आहे, या शाश्वत मूल्याची या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण हा शुद्धकल्याण देऊन गेला.


Sunday, August 28, 2016

अमीर खुस्रो – तुती – ए - हिंद




          अमीर खुस्रो – तुती – ए - हिंद 


                                                           अंजली मालकर 
                                                                            anjali.malkar@gmail.com


“गर फिरदौस बा-रौ-ए-जमीन अस्त हमी अस्त उ हमी अस्त उ हमी अस्त”. 

धरती पर अगर कही स्वर्ग है, तो यही है, यही है, यही है. कश्मीर विषयी बादशाह जहांगीर यांनी काढलेले हे उद्गार लाल किल्ल्याच्या साउंड अॅण्ड लाईट शो मधून ऐकायला आता जवळपास पस्तीस वर्षे झाली असतील. काय भारी वाटलं होते ते ऐकताना ! आई राष्ट्रसेवादलातली आणि वडील सैन्यामध्ये डॉक्टर, शिवाय त्यावेळचे दहा/ बारा वर्षाचे भाबडे वय, अक्षरशः रोमांच उभे राहिले होते. आजही त्याचे ठसे मनामध्ये तसेच कोरले गेले आहेत. नंतर शाळा संपेपर्यंत ‘ जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा’ हे कुठल्याशा सिनेमातले गाणे मला मिळणाऱ्या फरमाईशीमध्ये नंबर वन असायचे. असे हे देशप्रेमाने ओतप्रोत बालपण गेल्यानंतर तरुणपणी भारतीय संगीत नावाच्या विषयाच्या जे प्रेमात पडले ते आजतागायत ! त्यातून बाहेर यायची संधी मला मिळाली नाही, मी घेतली पण नाही. या विषयाला उलट सुलट, आतून, बाहेरून, सर्वांगाने तपासताना मी त्यात अधिकाधिक गुंतत गेले. त्याच्या संबंधी असणाऱ्या प्रश्नांच्या ओझ्यांनी माझ्या मनाची टोपली भरून जायची आणि ती रिकामी करण्यासाठी कधी पुस्तके, कधी जुनी रेकोर्डिंग्ज, तर कधी बुजुर्ग मंडळींची मदत मला व्हायची. जरा रिकामी झाली की परत प्रश्नांचे ढीग तयारच असायचे. अगदी डबा-ऐस-पैस खेळासारखे ! एकाला बाद करून डब्यापाशी आले की दुसरा लपलेला दिसायचा. तो बाद झाला की तिसरा ! हा खेळ मी बराच काळ खेळल्यावर माझ्या नजरेत एका गड्याचे नाव वारंवार येऊ लागले. स्वतःला ‘तूति-ए-हिंद’ म्हणजे हिंदुस्तानाचा पोपट असं म्हणवून घेणारा हा गडी होता अमीर खुस्रो.१३व्या शतकात दिल्लीच्या खिलजी सल्तनतीत, अल्लाउद्दिन खिलजीच्या पदरी राजकवी म्हणून असलेला हा महत्वाचा माणूस. सुरुवातीला मी त्याच्याकडे दुर्लक्षच केले. म्हटलं असेल कोणी एक, राजाच्या पुढे पुढे करून, ज्या त्या गायन प्रकाराचे, नवराग निर्मितीचे, नवताल निर्मितीचे, नवीन वाद्य निर्मितीचे श्रेय स्वतः कडे घेणारा प्रसिद्ध लोलुप कवी ! पण जेव्हा त्याला ओलांडून पुढे जाता येईना, तेव्हा तोच माझ्या पुढे येऊन उभा राहिला. माझ्या नजरेतली दूरस्थता पाहून दुखावलेल्या स्वरात म्हणाला “का एवढा दुरावा”. त्याच्याकडे एक धारदार कटाक्ष टाकला. “संगीतातल्या सगळ्याच नवनिर्मिती तुझ्या नावाने कशा ?” माझ्या स्वरातून बऱ्याच दिवसांपासून साठलेला फणकारा क्षणात बाहेर पडला. तो हसला. म्हणाला, “चल माझ्याबरोबर, तुला नेतो माझ्या काळात”. मग माझ्या परवानगीची वाटही न बघता त्याने मला ओढतच नेले. मी त्याच्याबरोबर तेराव्या शतकात गेले. कुतुबमिनार दिसल्यावर तो जरा थांबला, म्हणाला “बघ आता काय परिस्थिती आहे ती.” खरतर त्याने मला अशा प्रकारे इकडे आणलेले आवडले नव्हते. तरीसुद्धा कुतूहल म्हणून मी दिल्लीचा परिसर पाहू लागले. जलालुद्दीनची सत्ता संपून अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता होती तिथे. आधीच्या गजनवी, घोरीच्या स्वाऱ्यांनी होरपळलेली रयत, इल्तुमशच्या आक्रमणांनी भयभीत होऊन आता खिलजी राजवटीत जुलूम सहन करत अर्धमेली झाली होती. तुर्की संस्कृतीचे वर्चस्व जागोजागी दिसत होते. शासनातले सर्व अधिकारी तुर्की होते. राजसत्ता तुर्कांकडे असल्यामुळे, हिंदवी संस्कृती जणू राजपटलावरून पुसून गेली होती. तिथे राहणाऱ्या अनेक सामान्य लोकांनी ‘जान है, तो जहान है’ असे म्हणत निमूटपणे धर्मांतर स्वीकारले होते. अशा लोकांना दुय्यम किंवा तिय्यम दर्जाचे अधिकार मिळाले होते. अमीर, मलिकच्या उच्च पदांवर असलेले राजघराण्यांचे लोक, धर्मांतरितच नव्हे, तर इतर वंशांच्या प्रतिष्ठित लोकांपासून देखील फटकून राहत होते. तुर्की, फारसी,आणि अरबी काव्य संगीतात अखंड बुडालेला उच्च वर्ग, धर्मांतरित होऊन आपली प्रतिष्ठा कशीबशी सांभाळणारा हिंदुस्तानी मध्यमवर्ग, आणि सावकारी, कर्जबाजाराने परेशान, वेठबिगार गरीब वर्ग, समाजाचे असे तीन स्तर मला स्पष्टपणे दिसत होते. “पाहिलंस, किती भीषण परिस्थिती आहे ती. माझे वडील देखील मंगोलांच्या आक्रमणाने भिऊन तुर्कस्तानातून इथे पळून आले. सुलतान बल्बनने आसरा दिला म्हणून बरं झालं. हिंदुस्तानी धर्मांतरित मुलीशी माझ्या वडिलांनी शादी केली म्हणून मी नशीबवान समजतो स्वतःला ! आजोळचे हिंदुस्तानी संस्कार आणि तुर्की नस्ल (वंश) या दोन्ही गोष्टीनी मला काव्य, संगीताचा, संस्कार आणि मलिक, अमीरांचा सहवास या दोन्हीचे फायदे मिळवून दिले”. अमीर खुसरोच्या बोलण्याचा अर्थ मला आता थोडाफार कळू लागला होता. रागही थोडा कमी झाला होता.”अग ! अशा परिस्थितीत हिंदुस्तानी संगीताचे हाल कोणी कुत्र तरी खात होते का? मंदिरं नष्ट झाल्यामुळे ‘इल्म’ (ज्ञान) असलेले संगीत विद्वान दक्षिणेकडे पळून गेले नाहीतर अज्ञातवासात गेले. राजसत्तेमधून हिंदुस्तानी संस्कृती हद्दपार झाल्यामुळे आलीम (ज्ञानी) गायक, जाणते कलाकार, दरबार पर्यंत येणे शक्यच नव्हते”. त्याची बडबड चालूच होती. आता त्याला माझा देखील विसर पडला होता. एका वेगळ्याच मनस्थितीत तो स्वतःशीच बोलत होता. मला आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊ लागले होते. “तुला जर एवढे सगळे सोयीचे होते आणि एक नव्हे, तर तीन/तीन राजसत्तेतल्या सात सुलतानांचा प्रतिष्ठित कवी म्हणून मान होता तर कशाला केला हा खटाटोप”. माझ्या स्वरात अजूनही धार होती. त्या टोकदार शब्दांनी त्याची तंद्री भंगली. “हं, खटाटोप ! खरंच का केला बर मी? अग आजोळच्या हिंदुस्तानी वातावरणात वाढलोय मी. ऋतुगीते, सोहळे, सणवारात म्हटली जाणारी अनेक गीते मला नादावून टाकायची. काव्याची गोडी मला लहानपणापासूनच होती. एकीकडे मुशायरे, दरबारी रिवायत (रीत) यातून फारसी, अरबीमधले काव्य आणि संगीताचे भरपूर इल्म मिळत होते, पण समाधान नव्हते. तर दुसरीकडे हिंदुस्तानी संगीत माझी रूह (आत्मा) जाळत होती, मला घायाळ करत होती, पण त्याचे इल्म देणारा कोणी आलीम मिळत नव्हता. मला हिंदुस्तानी असण्याचा नाज (अभिमान) होता. सर्व जगात भारतीय संगीत सर्वश्रेष्ठ आहे हे मला उमजलं होतं, पण कळणार कसे ? मी इल्मदोस्ती पसंद कवी आहे. नुसत्या वाहवाहीवर भाळणारा नाही”. त्याच्या बोलण्यात तळमळ होती, सच्चाई होती. मी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले. “मग मला सुकून (शांती) मिळाला तो माझे पीर (गुरु) औलिया निजामुद्दीन चिश्तीच्या सहवासात. मी त्यांचा मुरीद (शिष्य) झालो”. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव बघून त्याने हे अपेक्षित असल्याचे स्मित केले आणि तो सविस्तर सांगू लागला. “इस्लामचा प्रसार करण्यासाठी हिंदुस्तानात या सल्तनती यायच्या अगोदरच सुहारवर्दी, काद्री, चिश्ती असे अनेक सुफी पंथ आले होते. प्रेमातून अल्लाहला भेटणे म्हणजेच इश्क-ए-मिजाजी (भौतिक प्रेम) मधून इश्क-ए-हकीकी (अध्यात्मिक प्रेम) पर्यंत जाणे हे या संप्रदायांचे तत्व होते. त्यातही चिश्ती संप्रदाय हिंदुस्तानी मिजाजाच्या अधिक जवळ आला. दिक्र म्हणजेच जिक्र (नामस्मरण) ही या संप्रदायाची खासियत होती. मला हा संप्रदाय आवडला आणि त्यांच्या ‘समा’ (बैठक) मध्ये मी शरीक (सामील) झालो. तुला माहिती आहे, हजरत निजामुद्दीन औलिया यांना देखील हिंदुस्तानी मुसिकीमध्ये (संगीत) बेहद दिलचस्पी होती. औलिया यांनीच संगीताला, त्यातही हिंदुस्तानी संगीताला उत्तेजन दिल्यामुळे त्यांच्या दर्ग्यात आम लोकांची हीsss रांग लागायची. खरतर मौसिकी ही इस्लामला कुबूल नाही, पण औलिया यांच्या प्रेमळ स्वभावाला ‘मौसिकीच’ शोभून दिसली. आणि माझ्यासारख्या वेड्याला त्यांनी हेरून त्यांचा पट्टशिष्य बनवले यात नवल ते काय!”. आता अमीर खुस्रो रंगात आला होता. विषय भरकटत आहे असे वाटून मी त्याला मध्येच तोडत विचारले, “हे सगळं ठीक आहे. पण हिंदुस्तानी संगीताचे काय ?” माझे बोलणे पूर्ण न होऊ देत तो लगेच म्हणाला, “तेच तर सांगतोय, मला फारसी आणि अरबी संगीतातले चार उसूल आणि बारा परदे माहित होते. पण हिंदुस्तानी संगीताशी मी अजिबात वाकीफ (ओळख) नव्हतो”. मला लक्षात आले की ज्या काळात अमीर खुस्रो वावरत होता, तो हिंदुस्तानातल्या सांगीतिक कोलाहलाचा काळ होता. शारंगदेवाच्या संगीतरत्नाकरातल्या अनेक पद्धती कालबाह्य झाल्या होत्या. ७ स्वरांच्या साप्तकाची संकल्पना तर होती, पण मूर्च्छना पद्धतीतून रागांचा आविष्कार करताना बारा स्वरांचा वापर होत होता. च्युत पंचम, च्युत षड्ज अशा अवघड गोष्टी आत्मसात करायच्या म्हणजे केवढा अभ्यास लागत असणार! धैवताला षड्ज मानून त्याच्या मूर्च्छनेत एखादा सांगीतिक विचार मांडण्यासाठी शास्त्राची केवढी बैठक लागेल, आणि हे सगळं अध्यात्म या परदेशी लोकांना कसं कळणार? या पार्श्वभूमीवर, अमीर खुस्रोच्या हिंदुस्तानी संगीत जाणून घ्यायच्या धडपडीचे मला कौतुक वाटू लागले. “मग तू काय केलेस?” शांत झालेल्या माझ्या आवाजाने त्याला जरा बरं वाटलं. माझ्याकडे आत्मविश्वासाचा एक कटाक्ष टाकत तो पुढे म्हणू लागला “मग मी मजलीस (बैठक) भरवू लागलो. गजल, सोहेला, गीत, यांची रचना करून आजूबाजूच्या आमिल (नवशिक्या) गवयांकडून गाऊन घेऊ लागलो. तसे दरबारात सनाचंगी, फुतुहा, नुसरत खातून, मेहेर अफरोज सारखे गायक आणि वादक कलाकार होते, पण त्यांना हिंदुस्तानी संगीताचा इल्म नव्हता. एकदा काही आमील हिंदुस्तानी गवयांनी दक्खनच्या गोपाल नायकाचे नाव सांगितले”. गोपाल नायकाचे नाव ऐकताच माझी कळी खुलली. मी एकदम म्हटले, “ अरे गोपाल नायक तर हिंदुस्तानी संगीतातले फार मोठे नाव होते. देवगिरीच्या यादव साम्राज्याचे ते राजगायक होते. मोठे शिव भक्त होते ते!. प्रबंध गायकीचे मोठे अधिकारी होते. राग कदंबक्कम आणि कुडूक्क तालाच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्या नावावर आहे. असे म्हणतात की ते गायला लागले की हरीण इत्यादी पशु आणि पक्षी त्यांच्याजवळ येऊन ऐकत बसायचे”. मी भडाभडा सगळी माहिती सांगून टाकली. अमीर खुस्रोने सुद्धा माझ्या होकारात होकार मिळवला आणि म्हणाला “तेच तर, बिना तीर कमानीने शिकार स्वतः शिकाऱ्याकडे शिकार बनून येण्याची बेहोशी याच मौसिकीत आहे, हे मला माहित होते आणि याचे इल्म फक्त गोपालनायक सांगू शकेल असे मला वाटले. म्हणून अल्लाउद्दिन खिलजीच्या एका फतेहमध्ये मी सेनापती मलिक काफुर बरोबर देवगिरीला गेलो. हजरत गोपाल नायक आणि त्याच्या मोठ्या शिष्य परिवाराला बाइज्जत दिल्लीला घेऊन आलो. अनेक दिवस त्याचे गायन ऐकले. माझ्या कुशाग्र बुद्धीने मी तसंच्या तसं गाऊ शकलो. दरबारात पैज जिंकली पण इल्म नाही हासिल करू शकलो. बहुतेक नायकांना मी त्या लायक वाटलो नाही”. अमीर खुस्रोची खिन्नता त्याच्या नजरेतून साफ दिसत होती. संगीताला पवित्र मानणाऱ्या हिंदुस्तानी कलाकारांची धारणा याला कशी कळणार! या रुहानी संगीतासाठी किती निर्मळता राखावी लागते, किती गोष्टींचा संयम राखावा लागतो ! हे याला जमले असते का ? मी मनात म्हटलं. पण पुढे काय झाले याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. माझी ही अवस्था ओळखून तो बोलू लागला, “पण मी हार मानली नाही. सगळ्या आवामला (लोकांना) या मुसिकीची जादू कळवणे हे जणू माझं मक्सदच बनलं होते. गोपाल नायकाने गायलेल्या प्रबंधांचा माझ्या कुवतीने अभ्यास करून मी इथल्या संगीतात तबदिली आणायचा प्रयत्न केला. हिंदुस्तानी संगीतातली क्लिष्टता कमी करण्यासाठी षड्ज, पंचम यांचे एकच रूप ठेवले. बाकीच्या स्वरांची देखील विकृत आणि शुद्ध असे दोनच रूप ठेवले. फारसी संगीतातील बारा परद्यांप्रमाणेच बारा स्वरांचे प्रमाणीकरण केले. त्यातून निर्माण होणाऱ्या रागांचे अरबी संगीत पद्धतीतील उसुले-मकाम पद्धतीत वर्गीकरण केले”. तो जसा जसा एकेक बदल सांगत होता तसे तसे मला सगळ्या श्रेयांची संगती लागू लागली. मी सहजच बोलून गेले, “अच्छा ! तर नवीन रागांची निर्मिती सुद्धा अशीच केलीस”. त्यावर तो पटकन म्हणाला,”हो तर ! याला निर्मिती असे तुम्ही म्हणता. मी आवाम आणि उमरांना एका धाग्यात जोडण्यासाठी हिंदुस्तानी मौसिकीत फारसी परद्यांची शिरकत (अंतर्भाव) केली. दोन्ही संगीताला एकमेकात मिसळले. म्हणजे बघ, तुम्ही गाता तो राग यमन घे. त्याला ऐमन देखील म्हणतात. हिंदुस्तानीतल्या हिंडोल रागामध्ये फारसीचा नौरोज मिसळला. झीलफ रागात हिंदुस्तानी पट आणि फारसी शहनाज मिसळला. फिरदोस्त तयार करताना कानडा,गौरी,पुरबी आणि फारसी अहंगचे मिश्रण केले. सर्परदा रागात गौड, बिलावल,सारंग आणि फारसी रास्तचे मिश्रण आहे. तसेच उश्शक, शहाना, साझगिरी, मोबर, फरगाना अशा अनेक रागांची रचना मी केली. हिंदुस्तानी संगीताला मुख्य प्रवाहात आणून त्याचा दरबारात मान वाढावा म्हणून केलेले प्रयत्न होते ते”. एकीकडे सरकार दरबारी फारसीचे महत्व आणि वर्चस्व मान्य करणे, आणि दुसरीकडे प्रेम मात्र हिंदुस्तानी तहजीबीवर करणे, ही तारेवरची कसरत तो कसा करत असेल याची पुरेपूर कल्पना मला आली. संगीताप्रमाणेच त्याचे काव्य निर्मितीच्या बाबतीत देखील तसेच धोरण दिसले. फारसी काव्याबरोबरच हिंदवी, ब्रज या हिंदुस्तानी भाषांमधून केलेले काव्य वर्गभेदाविषयी असणारी बंडखोरीच वाटली. त्याच्या ज्या काव्याने माझ्या मनात त्याच्या विषयी कुतूहल निर्माण झाले होते, ते फारसी काव्य डोळ्यासमोर आले.

छु मन तुती- ए- हिंद अर् रास्त पर्सी
झि मन हिंदवी परस्ता नघ्झ गोयं I 

स्वतःला हिंदुस्तानाचा पोपट म्हणवून घेताना केलेल्या बंडखोरीचे पारडे आणि त्याचे संतुलन राखण्यासाठी केलेल्या राजकीय तडजोडी दुसऱ्या बाजूने, असे स्पष्ट चित्र आता माझ्या समोर उभे राहिले. मनातल्या रागाची जागा आदराने घेतली. तरी पण माझ्या प्रश्नांचे पूर्ण उत्तर मिळाले नव्हते. मी अधीरतेने विचारले “ रागांचे समजले, पण तालांचे आणि गायन प्रकारां बद्दल काय ? आणि शिवाय तबला आणि सतार देखील तुझ्याच नावावर आहे की ....” मला मध्येच आडवत तो म्हणाला “अरे हो हो ! सांगतो ना थांब जरा. हे बघ मी आहे कवी माणूस. काव्य हा माझा मूळ पिंड. आता काव्य करताना वेगवेळ्या छंदांचा वापर ओघानेच होणार. त्यातून नवीन तालांची रचना घडली. उदाहरण म्हणून तो सुलफाक्ता तालच घे ना. त्याचे मूळ नाव उसुल–ए- फाक्ता आहे. फाक्ता म्हणजे कबुतर. कबुतराच्या दोन गुटूरण्यामधल्या अंतराचे मी निरीक्षण केले आणि त्याला एका आवर्तनात बांधले. झाला तुमचा १० मात्रांचा सुलफाक्ता, ज्याला तुम्ही आज सूल ताल म्हणता. अशा प्रकाराने फारसी काव्यातले अनेक बहर् (छंद) मी तालात तबदील केले. त्यातले पश्तो, जत, सवारी, फिर्दोस्त, छपक, खामसा झुमरा ताल पुढच्या काळातही टिकले. या शिवाय तू जर कौल, कल्बाना, नक्ष, गुल, कव्वाली, तराना,खयाल या गायन प्रकारांविषयी म्हणत असशील तर मी तुला परत तेच सांगेन की हे फारसी संगीतातले गायन प्रकार औलियाच्या ‘समा’ मध्ये गायले जातच होते. मी फक्त त्याचे हिंदुस्तानीकरण केले. ‘समा’ मध्ये ते जास्तीत जास्त गायले जावेत म्हणून त्यांच्या आकृतीबंधात सुधारणा केल्या, काही गायन प्रकारांमध्ये नवीन रचना केल्या. त्या खानकाहमध्ये गायल्या जाऊ लागल्या. लोकांना आवडू लागल्या. तुला सांगतो,की जेव्हा टाळ्यांच्या असराने बेहोष झालेले कव्वाल आवाज टीपेला नेऊन तराना गाऊ लागत, तेव्हा सगळा माहोल इश्क-ए-हकीकी बनायचा आणि औलीयांच्या चेहऱ्यावर मुस्कान दिसायची. तेव्हा मला जे समाधान मिळायचे ते मी बयाँच करू शकत नाही. मग त्यासाठी मला कोणी चापलूस म्हटलं तरी बेशक ! त्याचं काय आहे की जो पुढे येऊन समाजात काही तबदिली आणण्याची कोशिश करतो त्याला श्रेय आणि अपश्रेय दोन्ही घ्यावे लागते. हिंदुस्तानी मौसिकीचे गुण मला उमजले होते. मी तिचा निस्सीम चाहता होतो. या चाहतने आणि करम करतार औलीयाच्या आशीर्वादानेच फारसी आणि हिंदुस्तानी मौसिकीला एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला. पुढे काही आमिलांनी तबला आणि सतारीची निर्मितीही माझ्या नावावर टाकून दिली. पण अल्लाह कसम ! मी कुठेच असे म्हटले नाही की हे सगळे मी केलंय”. त्याच्या या पोटतिडीकीच्या स्पष्टीकरणावर मी गंभीरपणे विचार करू लागले. त्याच्या बोलण्यात तथ्य होते. त्याने लिहिलेल्या कुठल्याच साहित्यात या रागांचा, तालांचा, गायन प्रकारांचा उल्लेख दिसला नव्हता. तो पहिल्यांदा दिसला, तो औरंगजेबाच्या काळात, म्हणजे साधारण तीनशे वर्षांनी, फकीरुल्लाह या संगीतज्ञाच्या ‘राग दर्पण’ या ग्रंथातून. याचा अर्थ अमीर खुस्रो आणि हिंदुस्तानी संगीत हे समीकरण खूप नंतर तयार झाले. खुस्रो हा मितभाषी, राजपत्रित अधिकारी होता. जलालुद्दीन खिलजीने त्याला ‘अमीर’ या पदवीने सन्मानित केले होते. एक प्रतिष्ठित अधिकारी म्हणून त्याला मान होता. आपले महत्व कसे राखावे, हा मुत्सद्दीपणा त्याच्यात भिनलेला होता. त्यामुळे त्याने मकाम पद्धतीने केलेले रागवर्गीकरण पुढे विद्यारण्य, व्यंकटमखीसारख्या संगीतज्ञांनी स्वीकारून ते संस्थान, मेल, ठाठ अशा नावांनी हिंदुस्तानी संगीताच्या प्रवाहात एकरूप होणे स्वाभाविक होते. जेव्हा एखादी नवीन गोष्ट प्रकाशात येते आणि ती पुढे दीर्घकाळ टिकून राहते, तेव्हा ती गोष्ट घडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संपूर्ण टीमचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला त्याचे यश अथवा अपयश सोसावे लागते, ही समाजाची धारणा इथे चपखल बसतेय असे माझ्या लक्षात आले. याचे एक जातिवंत उदाहरण मला इतिहासातच सापडले. पंधराव्या शतकात धृपद शैलीला अभिजात संगीताच्या प्रवाहात आणण्याचे श्रेय ग्वाल्हेरचा राजा मानसिंह तोमर याला जात असले तरी त्यासाठी संशोधन करून, लोकप्रिय करण्यासाठी नायक बक्षु, भन्नू, बैजू, अशी संगीतज्ञांची तुकडीच राजाच्या पदरी होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुती- ए- हिंद असलेल्या अमीर खुस्रो आणि त्याचे गुरु हजरत निजामुद्दीन औलिया यांनी हिंदुस्तानी संगीतासाठी केलेली अजोड कामगिरी नाकारणे मला त्यांच्यावरच नव्हे तर हिंदुस्तानी संगीतावर अन्याय केल्यासारखे वाटू लागले. वरवरच्या किंवा सांगोवांगी गोष्टीमुळे आपण भरकटलो ही चूकही उमजली. अमीर खुस्रोची माफी मागितली पाहिजे, असे वाटून मी शेजारी पाहिले तर तो नव्हताच ! त्याच्या बरोबर केलेल्या मुशाफिरीने मन हलकं झालं होतं. मी सस्मित होऊन मग नेहेमीप्रमाणे प्रश्नांचे ढीग उपसून रिकाम्या टोपलीकडे पाहू लागले.  

Thursday, July 28, 2016

Rediscovering Veenatai Sahasrabuddhe – Exemplary artist of Paluskar Tradition


Rediscovering Veenatai Sahasrabuddhe – Exemplary artist of Paluskar Tradition 

                                                                                                                                                                                                                                                                                           Anjali Malkar

On 29th June this year, Veenatai departed, for the heavenly abode. She became one with the the eternal sound of the universe.  For the last four years, us, students were watching her, battling helplessly with an incurable disease.  We were in awe of Baba’s (Dr. Hari Sahasrabuddhe) ability to savor every precious moment with Veenatai, displaying strength to face the adversity with courage and fortitude.
As for me, I was fortunate to be her disciple for many years, the years when her career was on flight. Armed with a degree of M.A music, I joined her class and for ten years for at least three hours nearly every day, I had witnessed her magician-ship in singing.  Whether there be a festival, or a holiday, all the days in the year were converted into music celebration.  A simple and graceful woman, Veenatai was an ultimate example of an inspired musician for me. The obsession I experienced during those days is unforgettable. Veenatai purposefully avoided indulgence in matters other than music and focused on improvement in music making. She introduced to us to the compositions of Pt Ramashreya Jha, Pt Balwantrai Bhatt, and Pt. Vasant Thakar and also to the music of her father Pt. Shankar Shreepad Bodas and her brother Pt. Kashinath Shankar Bodas. Flawless both in words and tunes, she demonstrated the beauty of the compositions with great ease. When I joined her class, I was a small girl coming from a small town. Every class opened the deepest caves of musical treasure and I felt overwhelmed and desperate at the same time.  The glittering notes, meaningful words in the Bandish imbibed in us, the aesthetic beauty of lyrics in Classical music.
Veenatai was a humble musician.  As I remember, she never felt beneath to learn a particular bandish she needed for the cassette from a novice girl like me. She sat for hours with a Dagga to teach a large group of multileveled students in SNDT College even on fasting days without a slightest sign of exertion. Long after she resigned from the college, the department still cherished the memories of her dedication to the

Monday, February 22, 2016

निर्गुण

                            



                                                              निर्गुण
                       

                                                                                                     

अंजली मालकर      
 www.anjalimalkar.com

गाणगापूरला गाणं म्हणायचं निमंत्रण आलं. सहज जमतंय तर जाऊन येऊ असं वाटलं म्हणून त्यांना होकारही कळवला. ‘फार भाग्यवानांना अशी निमंत्रण येतात‘ वगैरे प्रतिक्रिया, मी कुठलीच भावना व्यक्त न करता जिरवली. कारण माझा असे ‘भाग्यवान वगैरे गोष्टींवर फार विश्वास नाही, त्याही पेक्षा मी त्यावर फारसा विचार करत बसत नाही. गाणं आणि गाण्याच्या अनुषंगाने येणारे अनुभव, मग ते माणसांचे असो, जागेचे असो किंवा आणि कुठलेही असो, यात मला जास्त रस असतो. (जन्माला आलेल्या प्रत्येकाने काहीतरी पराक्रम करून मेले पाहिजे असा बाणेदारपणा बाळगणाऱ्या माझा आता असा अट्टहास कमी झालाय. ही अनुकंपा तत्वावरची सवलत माझ्यासहित सर्व मानवजातीला मी देऊ लागले आहे हेही तेवढेच खरे! असो ) तर होकार देताना माझ्या मनात कुतूहल होतं ते या मागच्या परंपरांची मूळं अनुभवण्याचे. लोकसंगीत आणि नागर संगीताला जोडणारा धागा संत काव्याबरोबरच, महाराष्ट्रभर फोफावलेल्या अशा प्रकारच्या परंपरांमध्ये आपल्याला सापडतो.त्यात ही इतर परंपरापेक्षा दत्त संप्रदायाची व्याप्ती महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा, विदर्भात पाहायला मिळते. समाजातील सगळ्या स्तरात रागसंगीताचा झालेला शिरकाव दत्त संप्रदायाच्या पीठांमधून, तिथल्या मठाधिपतींकडून मोठ्या प्रमाणावर झाला हे मला माझ्या घरावरूनच माहित झाले होते. (माझ्या आजोळसारख्या अनेक घरांमध्ये दर गुरुवारी होणारी दत्ताची आरती आणि गाणी यांचा गायन संस्कारात मोठा वाटा आहे हे ओघाने आलेच ) सारंग,भूपाली,काफी,पटदीप सारखे साधे साधे राग ज्यांना देशी राग म्हणत,समाजातील सर्व स्तरात गायले जायचे. हे वर्षानुवर्षे वारशाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्स्फर झालेल्या अंगाई गीते, भोंडल्याची गाणी यातून सहज लक्षात येते. त्यामुळे अशी ठिकाणे माझी अभ्यास कम इमोशनल केंद्रे होणे नॅचरल होतं. गुरुचरित्रात येणारे गाण्याचे रेफरन्स, १६व्या शतकात आंबेजोगाई जवळ राहणारे, रोज एक ढब्बू पैशाची शाई वापरणारे दत्त भक्त कवी आणि रागसंगीताचे गायक दासोपंत आणि शतकानुशतके शास्त्रीय गायनाचे महोत्सव घेणारी माणिकनगर, गाणगापूर, अक्कलकोट सारखी धार्मिक स्थाने म्हणून माझ्यासाठी इंटलेक्चुअल आणि इमोशनल विषय ठरतात. एरवी महाराज, कर्मकांड, नैवेद्य अशा गोष्टीकडे तटस्थपणे पाहणारी मी, याबाबतीत मात्र तशी राहू शकत नाही.

तर गेली १०० वर्षे, दर माघ प्रतिपदेला चार दिवस होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी उद्यान एक्स्प्रेसने मी गाणगापूरला निघाले. नाही म्हटलं तरी अशा स्थळांवर होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवाचे एक, दोन अनुभव माझ्या गाठीशी होतेच. पण गाणगापूर हे जाज्वल्य स्थान असून भूत प्रेत उतरवण्याचे लोकप्रिय ठिकाण आहे अशी वेगळी माहिती मला मिळाली होती. त्यामुळे तशा तयारीनेच मी निघाले होते. छोटी तंबोरी, एक सॅक आणि पर्स अशा सामानासहित सेकंड क्लासमध्ये बसले. आताशा एसी बोगी किंवा स्वतंत्र कार, लक्झरी बसची सवय झाल्यामुळे साध्यासुध्या लोकांबरोबर खाद्य पदार्थ शेअर करत, गप्पा मारत झालेल्या या प्रवासाने, शहरी शिष्टपणा घालवला आणि मन हलकं झालं. शिवाय अशा ठिकाणी गायला जाताना फॉरमॅलिटीज बाजूला ठेवल्या तर अनुभवाची तीव्रता अधिक वाढते, हे मी आतापर्यंत अनुभवले होते. सोबतच्या प्रवाशांचा रागरंग बघितला आणि अभ्यासासाठी घेतलेले पुस्तक, अभ्यास तसेच बॅगेत ठेवत, बरोबरच्या प्रवाश्यांशी फोन नंबर, व्हॉट्सअॅप एक्स्चेंज करत गाणगापूर रोडच्या स्टेशनवर उतरले. स्टेशनावर उतरायच्या अगोदर दोन मोठ्ठ्या पाणीदार नद्या, ऊस, ज्वारीची हिरवी, सोनसळी शेते, समृद्धीच्या तुरळक खुणा दाखवत असली तरी वातावरणात एकप्रकारचे औदासिन्य होते. छोटी छोटी गावं, त्यातही उंच टेकड्यांवर गोपुर असलेली मंदिरं, तुरळक झाडी, नापीक माळरानं हताश आयुष्याच्या अस्पष्ट जाणीवा तयार करीत होती.

मुंबईहून आलेला एक सहकलाकार आणि मी नाकावर रुमाल ठेवूनच स्टेशन बाहेर गेलो. धूळ ! प्राणवायूच्या बरोबरीने आपले अस्तित्व दाखवत तिने आमच्या कपड्यांवर, बॅगांवर कब्जा मिळवला होता. मी मूळची मराठवाड्यातली, त्यामुळे मला धुळीच्या अंगलटीची थोडी फार सवय होती. पण मुंबईचा माझा मित्र मात्र स्टेशनपासून बसस्टॅण्डपर्यंतचे अर्धा किलोमीटर अंतर पायी चालताना हैराण झाला. रस्त्याच्या कडेने रांगेत असलेली चहाची टपरी, मग भज्यांचा स्टॉल,त्याला लागुनच पानटपरी आणि नंतर सिमकार्ड आणि काहीबाही विकणारी दोन चार दुकाने,दुकानांसमोर  कोंडाळी करून बसलेली मंडळी, येणाऱ्या प्रवाशांकडे कुतूहलाने पाहणारी लहान सहान मुले, गाडीतून उतरलेल्या गावातल्या प्रवाशांचा गलका,कुठल्याही तालुक्याच्या गावात दिसते तसे दृश्य बघत आम्ही बसस्टॅण्डवर पोहोचलो, तेव्हा सूर्य अस्तास गेला होता. धूळ आणि संधिप्रकाशाच्या मिश्रणातून गावातला मुळात असलेला बकालपणा जास्तच जाणवायला लागला. आमच्या समोरूनच एक बस गाणगापूरला गेल्यामुळे स्टॅण्ड सुस्त झाले होते. बस स्टँड समोर पँसेंजरची वाट बघत बसलेल्या रिक्षावाल्यांनी आमचे नवखेपण बघून आम्हाला डायरेक्ट मंदिरात नेण्याचा लकडा आमच्या मागे लावला. पण त्यांचे दर  ऐकून आम्ही आमचा मोर्चा एकच उरलेल्या बसकडे वळवला. ‘हो बस गाणगापूर मंदिरालाच जाते’ असं कानडी हेलात बोलून ड्राईव्हर, कंडक्टर आमच्या समोरून दुसरीकडे निघून गेले. आता ही बस कधी भरणार, कधी जाणार, आणि गेल्यावर मला विश्रांती न घेता लगेच गावे लागणार या काळजीत मी होते. पण दूसरा उपायही नव्हता. शेवटी एक, दोन पॅसेंजर चढल्यावर मी सुद्धा सामान घेऊन एक लांब सीट आपल्या सामानासहित ताब्यात घेतली. थोड्याच वेळात ड्राईव्हर, कंडक्टर आले. आणि गुळाचा वास येऊन सगळ्याकडून मुंगळे चिटकावेत, तसे पाहता पाहता बस भरू लागली. इरकली साड्या, खणाची पोलकी, टिकल्यांच्या फॅन्सी साड्या, फ्रॉक, गांधी टोप्या, शर्ट पायजामा, शर्ट पॅंट याने बस तुडुंब भरली. बस मध्ये घाम आणि दारूचा एकत्र वास दरवळला. कानडी, हिंदी, आणि मराठीचा कलकलाट सुरु झाला आणि ‘राईट’ आवाज येताच ड्राईव्हरने गाडी स्टॅण्ड बाहेर काढली. ‘अरे! आपण कर्नाटक राज्यात आलो. टिंग टिंग नाही इथे’ स्वतःशीच हसत सभोवतालचा अंदाज घेत असतानाच खस्सकन माझ्या खिडकीची काच पलीकडे ओढली गेली. गाडीतला मंद दिवा, सामान आणि गोंधळ यामुळे मागे बघणे शक्यच नव्हते. एकीकडे कंडक्टर झोपलेल्यांना उठवत, दोनाच्या ठिकाणी तीन बसवत होता, तोंडाने कधी मराठीत तर कधी कानडीत लोकांवर खेकसत होता तर दुसरीकडे प्रवासी आणि कंडक्टरचे हे मनमोकळे वाक्युद्ध ड्राईव्हरने व्यवस्थित कानाआड केले होते. ‘खस्स’ खिडकीची काच माझ्या दिशेला सरकली गेली. माझ्या काचेला हँडल नसल्यामुळे मी ‘खस्स’ ला प्रत्युत्तर देऊ शकत नव्हते. सरकणारी काच बघत बसणे आणि आपला हात सांभाळणे एवढेच काय ते माझे काम ! गाडी आता मोकळ्या वाऱ्याला लागली आणि गावाकडची खास थंडी जाणवू लागली. ‘खस्स’ परत काच सरकली, मागचा किलबिलाट थांबला आणि टिपेला गेलेले आवाज हळू हळू निवळू लागले. उभ्या लोकांना धरण्यासाठी असलेल्या स्टीलच्या उभ्या खांबाने वरच्या आडव्या खांबाशी एकदम भांडण काढले आणि तो धरेल त्याच्या बरोबर आडव्याच्या मागे पुढे फिरू लागला. प्रवाशांमध्ये हशा पिकला आणि बसमध्ये खेळकरपणा आला. रस्त्याच्या पिवळट प्रकाशाचे एक पिल्लू बसमध्ये लावलेले असल्यामुळे जुनेपणाचा आभास आत आणि बाहेर असा दोन्हीकडे जाणवत होता. निजामशाहीत असलेल्या एका टिपिकल गावाचा लूक मला मध्ययुगाकडे नेत होता. काळाचे यंत्र उलटे फिरवून बस मला एकोणिसाव्या शतकाकडे घेऊन चालली होती. ‘खड्ड’ बस अचानक थांबली. माझ्या विचारांची तंद्रीही भंगली. चौकशी केली तर सगळ्यांची तिकिटे काढून व्हावे म्हणून ड्राईव्हरने बस थांबवली होती. माझ्या कपाळावर आठ्या चढल्या. पण प्रवाशांना बहुतेक माहित असावे. ‘गाडी हळू हळू चालवा, होतील सगळ्यांची तिकिटे काढून’, ‘उशीर झाला आहे’, ‘आम्हाला गुलबर्ग्याला जायचे आहे, गाडी चौडपूरला थांबवा’ अशा अनेक सूचनांच्या भडीमारावर ड्राईव्हरने मौन बाळगले. ‘खस्स’ पुन्हा एकदा खिडकी माझ्याकडे ढकलली गेली आणि अर्धं अंग बाहेर काढून मागच्या स्त्रीने तीन खिडक्या पलिकडच्या ड्राईव्हरशी थेट संवाद साधला. ‘अर्धी गाडी झाली राईट’. ‘राईट’ हा परवलीचा शब्द ऐकताच ड्राईव्हरने गाडी सुरु केली आणि समोरच्या वेशीचा बुरुज ओलांडून ती भरधाव मंदिराच्या दिशेने निघाली. ‘तिकीट किती आहे ?’. ‘मुअत्तु’. ‘अहो परवाच तर वीस रुपये होते, आता तीस कसे?’. ‘यात्रा म्हटलं की वाढवली की त्यांनी’. प्रवाशांच्या संवादांना कंडक्टरकडून टर्र टर्र एवढेच उत्तर आले. थोड्या वेळाने बसच्या समोरच्या भागात रिकाम्या पोटी दारू प्याल्यावर कसा त्रास होतो ही चर्चा, मधल्या भागात गुलबर्ग्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो हा हिशोब, तर शेवटच्या भागात मोबाईल वरून ‘सांग सांग भोलानाथ’ या बालगीताचे मोठ्या आवाजात प्रक्षेपण सुरु झाले. बस आता सेटल झाली होती. बस मधली बहुतेक शरीरं उन्हात रापलेल्या कष्टकऱ्यांची होती. काटकुळे हात पाय, सुरकुतलेले चेहरे त्यांच्या खडतर आयुष्याची कथा सांगत होते. हीच लोकं माझं गाणं ऐकणार आहेत का ? तेही क्लासिकल ? माझ्या समोर यक्ष प्रश्न पडला होता. माझा मुंबईचा मित्र मात्र एवढ्या गर्दीला आणि वातावरणाला जाम वैतागला होता. शेवटी तासाभराने एका मोठ्या चौरस्त्यावर आम्हाला सोडून गाडी जोऱ्यात पुढे निघून गेली. संध्याकाळचा धूसर प्रकाश आता काळ्या मिट्ट अंधारात विरघळून गेला होता.एखाद्या तालुक्याच्या गावी रात्री जेवण झाल्यावर जे निजानिजेचे वातावरण असते, तसेच दृश्य मला रस्त्यावर दिसत होते. बंद दुकानांच्या कानडी, मराठी पाट्या, जागो जागी शांत धर्मशाळा, मंदिरं, आणि शेवटची कामे उरकणारी मंडळी. यात्रेची रोषणाई, आनंद, गर्दी कुठेच नाही. नाही म्हटलं तरी माघ पौर्णिमेनंतरचा भरात आलेला चंद्र आभाळभर आपली माया पसरत होता.
त्रासलेले, थकलेले आम्ही एकदाचे आमच्या निवासस्थानापाशी पोहोचलो. वाट पहात असलेल्या यजमानांनी आपुलकीने स्वागत केले. ओळख होऊन प्रवासाची विचारपूस करत असतानाच एक गाडी भरून यात्रेकरू आले. यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंचे शिधेचे सामान, ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा’ गजर करत चाललेली भजन पाहून माझ्या पुढचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले. उत्साह, आनंद, हास्य अशा मनुष्याच्या इंद्रधनुषी छटांपेक्षा, गांभीर्य, तटस्थता, आणि कर्तव्याच्या करड्या रंगाची छाया जाणवू लागली. गाणगापूरच्या दत्तात्रयाच्या सौम्य, सोशिक स्वरुपाकारात गूढवाद शिरला होता. पटकन आवरून फर्लांगभर लांब असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले तेव्हा गाण्याच्या प्रयोजनाची कल्पना पुरेशी स्पष्ट झाली. जुनाट धर्मशाळेच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या उंबराच्या झाडाखालच्या छोट्या दत्ताच्या मंदिराभोवती शे-सव्वाशे लोकं बसतील असा मंडप घातला होता. समोर चाललेल्या कीर्तनाला पन्नास जागी मंडळी साक्षीदार होती. बाकी धर्मशाळेच्या सर्व ओट्यांवर डोक्यापासून पायापर्यंत पांघरूण घेतलेल्या निद्रिस्त मानवाकृती ! आपल्यापासून दहा फुटावर चाललेल्या सूर लयीच्या व्यवहाराशी काडीचाही संबंध नसणारी ! गम्मत म्हणजे संपूर्ण रात्रभर चाललेल्या या संगीत महोत्सवाच्या दरम्यान एकानेही पांघरूण उघडून साधे पहिले देखील नाही. पाचशे मीटरच्या परिघात असलेली ही दोन जग एकमेकांपासून इतकी अलिप्त कशी राहू शकत होती याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. पोपडे निघालेल्या धर्मशाळेतल्या भिंतींइतकेच का पोपडे निघालेले त्यांचे आयुष्य होते की ज्यामुळे त्यांना सूर लयीच्या मखमली जाणीवा स्पर्शू शकत नव्हत्या ! दोन्ही जग इतके आत्ममग्न होते की त्यांचे एकमेकांसोबत असणे हे नसण्याच्या बरोबर होते.

मी मग माझ्या जगातल्या माणसांकडे बघू लागले. निद्रिस्त जगाची काळी गडद छाया या रंगीबेरंगी जगावर पडलेली स्पष्ट दिसत होती. त्यामुळे या जगातल्या बहुरंगी बहुढंगी स्वर लयींचे रंग, आकार निर्गुणी झाले होते. व्यवहारी जगात यशस्वी झालेले मोठे मोठे कलाकार,सर्वच बाबतीत मोजकेपणा असणाऱ्या या अव्यवहारी गूढ जगाकडे वर्षानुवर्षे का येत आहेत याचेही कोडे वाटले. आपल्या घराण्यातली शतकाची गायनाची परंपरा अनेक कष्ट उपसून इमानाने ओढणारे आयोजक, संगीतासारख्या चैतन्यमयी कलेला बाधक असणारं विपरीत वातावरण आणि अशा वातावरणातही कलेचे गूढत्व शोधणारे एकापेक्षा एक कलाकार ! या सर्व जाणीवा मला वेगळ्या स्तरावर नेत होत्या. सुरेल प्रासादिक गायनाच्या पार्श्वभूमीवर मनस्वास्थ्य हरवलेले चीत्कारणारे स्त्री पुरुष किंवा उलटं म्हणा, मला निरुत्तर करत होते. बरं इतरांना असं काही वेगळे वाटते का हे बघण्यासाठी आजूबाजूला पाहिले तर हे जे मला जाणवत होते ते इतरांच्या दृष्टीने अत्यंत सहज होते, सवयीचे होते.
सकाळी गर्दीत दर्शन घेण्यापेक्षा रात्री निवांतपणे जावे म्हणून आम्ही काही कलाकार मुख्य मंदिराचे दर्शन घेण्यासाठी बोचऱ्या थंडीत रात्री अडीचला गेलो. मला वाटले असतील पाच- पंचवीस लोकं. प्रत्यक्षात होते शंभर- दीडशे ! सर्व देवस्थानांमध्ये दोन्ही बाजूने दुकाने असणारी छोटी वाट इथे सुद्धा होती. रात्री दुकाने जरी बंद असली तरी सकाळी होणारी वर्दळ लक्षात येत होती. मंदिरापाशी भक्क पिवळा प्रकाश आणि या भक्क प्रकाशात जुनाट हेमाडपंथी मंदिर, लोखंडी जाळ्यांनी कैद होते. विशेष अतिथींसाठी वेगळा मार्ग आणि सामन्यांसाठी वेगळा, अशा दोन्ही मार्गांवर पुजाऱ्यांची करडी नजर होती.मानसिक स्वास्थ्य हरवलेले अनेक भक्त या ठिकाणी बरे होतात अशी श्रद्धा असल्यामुळे अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देता देता वस्कून अंगावर धावायची सवयच या अखंड ओलेत्या पुजाऱ्यांना लागलेली दिसली. एका छोट्या खिडकीतून दर्शन घेण्यासाठी वाकले तर चांदीचा वर्ख लावलेला छोटासा गाभारा आणि त्या गाभाऱ्यात ठेवलेल्या पादुका म्हणजे चांदीच्या चपलेमध्ये ठेवलेले दोन दगडी गुळगुळीत पाय सदृश आकार ! कुठेही मूर्ती नाही, कुठेही रंग नाही, केवळ चंदेरी रंगामध्ये दोन काळे मोठे ठिपके. काळ्या पांढऱ्याचा हा तटस्थपणा स्वरात उतरला की त्याला येणारे निर्गुणत्व हेच या गाणगापुरच्या मातीचे वैभव असावं, असे मात्र त्या क्षणी वाटून गेले ...


Friday, February 12, 2016

बसंत बहार







बसंत बहार





   अंजली मालकर


पहाटेची थंडी आणि दिवसभराचे उबदार उन, त्यांचे फ्युजन होऊन मनावर सैलसर पसरले होते. दुपारच्या वामकुक्षीसाठी लोडाला टेकता टेकता ‘ऋतूराज आज वनी आला’ या नाट्यपदाचे स्वर कानावर पडले. सहजच त्या सूरांमध्ये मी माझा सूर मिसळला. गाता गाता जाणवलं की षड्जाच्या डान्सिंग फ्लोअरवर रिषभ-पंचम आणि मध्यम-निषाद या दोन स्वरांच्या जोड्या केवढ्या खुलून दिसत होत्या. देस, तिलककामोद, केदार रागांच्या गिरक्या घेत घेत या गीतात दोन्ही जोड्यांनी केवढा रोमान्स  भरला ! मग अशा स्वरांचा फील घेण्याची मौजच वाटायला लागली. मग मला लक्षात आले की ही तर वसंताची चाहूल आहे. ज्या ऋतुराज वसंताच्या गीताने मनाला भुरळ घातली, तेच नाव मिरवणाऱ्या बसंत या ऋतुकालीन रागाच्या कुंडलीचा शोध सुरु झाला.
माघाच्या बसंत पंचमीपासून चैत्रातल्या गुढीपाड्व्यापर्यंत वसंताचा हा बहर काळ. सृजनाचा, चैतन्याचा, यौवनाचा हा मोसम. शिशिराने गारठलेली सृष्टी या वसंताच्या चाहुलीने जागी होते. मग त्याच्या स्वागतासाठी ‘कल्चरल इव्हेंटस’च्या टीम्स तयार होतात. मनुष्यापासून ते भुंग्यापर्यंत साsरे या समारंभात सहभागी होतात. आपल्या उत्सवप्रिय समाजाला spring is coming, spring is coming, birdies build their nest’ ही वर्डस्वर्थची लगबग कशी बरं मानवेल ! द्रुमा: सपुष्पा: सलीलं सपद्मं, स्त्रिय: सकामा: पवन: सुगन्धी: I असा निसर्गातील बदल रसिकतेने टिपणाऱ्या कालिदासापासून, “मधुकर आज बसंत बधाई, खिले खिले नीलम पल्लव पर आंगन में अमराई Iकानन कानन उपवन उपवन ,खिले सुमन दल सुरभित कण कण,ये कैसी मदभरी पी की बैन, पंचम तान सुनाई” I     अशी बसंताची बंदिश गाणाऱ्या गायकापर्यंत, सगळ कसं चैनीने साजरी करणारी आपली संस्कृती.
            तीव्र मध्यमाकडून कोमल धैवत मार्गे तार षड्जाकडे झेपावून, मग तिथे थोडं रेंगाळत खाली पंचमापर्यंत घरंगळत येऊन, मध्यम – गंधाराच्या जोडीला उगीच टपली मारणे राग वसंताच्या राजस रोमॅटींसिझमला अगदी शोभणारे आहे. तीव्र मध्यमाची ऊब सर्व रागभर पसरली असताना हळूच शुद्ध मध्यमाला त्याच्याबरोबर घेऊन येणे, मन मोहरून टाकत. हे स्वरलालित्य वसंत ऋतूचा माहोल सांगून जाते. ‘ए नबी के दरबार, सब मिल गावो, बसंत ऋत की मुबारकी’ या बंदिशीतून भेटलेला स्वरवसंत उत्सवाचे रूप घेऊन येतो.
भारताच्या उत्तर भागात बसंत पंचमी फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. हिंदू – मुसलमान या दोन्ही समाजात या सणाला महत्व आहे. देवी सरस्वतीचा जन्मदिन म्हणून हिंदू समाजात देवी पूजनाचा सोहळा असतो तर सूफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहोरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडवलेली वस्त्रे घालून हा सण साजरा करतात. चहूकडे पसरलेली पिवळी धम्म मोहरीची शेती, पांढरट मोहराने फुललेल्या आमराया, कोकिळेचे कूजन, भुंग्याचा गुंजारव आणि वातावरणातला धुंद सुगंधी दरवळ, ही सगळी मस्ती उतरते मग राग बहारच्या विविधरंगी स्वरांमध्ये,उतरया कोमल निषादावरून पंचमावर केलेली घसरगुंडी, मग तिथेच थोडा वेळ बसल्यानंतर नाकापर्यंत लोंबलेल्या गुच्छ चटकन खुडावा तसे ‘नीनीपमप’ ची स्वरावली पटकन कोमल गंधाराकडे सूर मारते. तिथेही मन न रमल्याने वर परत मध्यमाकडून खाली रिषभाला भेटून षड्ज गाठते. भुंग्याची गती आणि मती असणाऱ्या या बहारला मग घाई होते वरचा षड्ज गाठायची. गंधार, मध्यम, धैवत करत एकदम शुद्ध निषादाचा रस्ता धरून वरचा षड्ज गाठण्याचे बहारचे धक्कातंत्र भल्याभल्यांना चकित करते.  वसंताचे वैभव शब्दरूप करणारे काव्य आणि त्याचा फील देणारी बहारची स्वरकाव्ये, दोन्ही गेली सहाशे वर्ष निजामुद्दीन अवलियाच्या खानकाहमध्ये बसंत पंचमीचा रंग लुटत आहेत.
‘सकल बन फूल रही सरसो, अंबुवा फुले टेसु फुले,
कोयल बोले डार डार, और कोई करत सिंगार,
मालनिया गरवा पे आयी घरसो I
तरह तरह के फूल लगाये, ले गरवा पेह्नू ते आये,
ख्वाजा निजामुद्दीन के दरवाजे पर,
आवन कह गये आशकरंग और बीत गये बरसो I
कव्वालापासून सामान्य माणसापर्यंत राग बहारात गुंफलेले हे काव्य, सरसूच्या फुलांसोबत जेव्हा पीराला सप्रेम भेट दिले जाते तेव्हा वसंताचा बहर अजून फुलून येतो.
          निसर्गात रूप,रंग, गंधाची एवढी उधळण चालू असताना माणसाचे मन कोरडे कसे राहील ! निसर्गातला रोमान्स अंगाअंगात भिनून प्रकट होणारा ‘फाग’ उत्सव, रंगोत्सव, वसंताला अजून उन्मत्त करतो. हिंडोल रागाच्या स्वरांवर हिंदोळे घेत गायलेल्या धमार गीतातून नखशिखांत यौवन पुन्हा भेटीला येते. तीव्र मध्यम, शुद्ध धैवत आणि षड्ज चढून स्वरझोका येताना शुद्ध धैवत, तीव्र मध्यम आणि गंधारावर थांबतो. पण पकड सैल झाल्यामुळे तो पुन्हा थोडा लांब, मध्यमापासून गंधार आणि शेवटी षड्जावर येऊन थांबतो. हिंडोलचा हा झोका तेव्हा होळीमध्ये रंग टाकणाऱ्या कन्हैयाला चुकवण्यासाठी राधेने घेतलेला उंचच उंच मोठ्ठा झोका वाटतो.

अब रंग लगावे डारे, बसंत फुली सी नार I
अबीरगुलाल चोवा चंदन, केसर रंग भर भर पिचकारी I

हिंडोलात रंगलेला हा धमार, धमार तालाच्या चौदा खणात पखवाजाबरोबर खेळताना ‘कधिटधिट’ ची नोंक झोंक आणि धा च्या थापेची गुंज रोमा- रोमात चैतन्य निर्माण करते.

तसे पहिले तर हिंडोल या पुरुष रागाची बसंत ही रागिणी. गुरुग्रंथसाहेबमध्ये भेटणारी शुद्ध बसंत ही त्याची खरी अर्धांगिनी. पियाच्या शुद्ध धैवताच्या पगडीचा रंग, आपल्या चुनरीला दे अशी रंगाऱ्याला विनवणी करणारी. पण कालांतराने आपली अशी कोमल धैवताची आयडेंटीटी सिद्ध करत कर्त्याची भूमिका बजावणारी बसंत रागिणी, ऋतुराज वसंताची घट्ट मैत्रिण बनली. केदार, बहार,भैरव या मित्रांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवून तिने बसंतीकेदार,बसंतबहार, भैरवबसंत असे ग्रुप्स तयार केले. आजही जेव्हा गोठवणाऱ्या थंडीनंतर उबदार सोनेरी किरण आपल्याला सुखावतात, थंडी सहन न होऊन आपली पाने झाडून निष्पर्ण होऊन बसलेली झाडे नव्या पानांचे कपडे शिवून मिरवायला लागतात, कोकीळ, भुंगा, मधमाश्यांसारखे सजीव काहीतरी छान घडतंय याची खबरबात देतात, तेव्हा वसंतराजाचे आगमन होतंय हे सांगणारा बसंत राग तुमच्या – आमच्या मनात प्रीतीचे रंग भरत असतो.

Wednesday, January 13, 2016



कालजयी कुमार
अंजली मालकर


नुकत्याच 'कालजयी कुमार गंधर्व' या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले होते. भरगच्च भरलेल्या हॉंल, मोठ्या रांजणांमध्ये गुलछ्ड्यांनी केलेली स्वरमंचाची सजावट मस्त दिसत होती. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते मागे असलेल्या कुमारांच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोने. वाटत होते कि संपूर्ण स्टेजच त्यांच्या अदृश्य अस्तित्वाने व्यापले होते. कुमारांच्या मिटल्या डोळ्यातूनही दिसणारी त्यांची विजिगिषु वृत्ती, ताठ बसलेल्या बैठकीतून दिसणारा आत्मविश्वास आणि एक हात उंचावून अवकाशातल्या नाद तत्वाशी त्यांचा संवाद;  हा फोटो नसून बंदिशच होती कुमारांची, उर्ध्वमुखी उर्जिता ! विचाराच्या नादात माझ्या समोर चाललेला कार्यक्रम पुसट झाला आणि शंभरवेळा ऐकलेल्या बंदिशी रुंजी घालू लागल्या. मनाची घालमेल सुरु झाली. मन पुन्हा त्या दुनियेत जायला मागू लागले. तेव्हा अभ्यासकाचा कोट उतरवला, मन निर्लेप केले, आणि आपलं शिष्य मन आणि श्राव्य अनुभवाची शिदोरी घेऊन कुमार पाहण्यासाठी त्यांच्या संगीत घरात शिरले
शिरल्या शिरल्याच अंग न्हाऊन निघाले ते तेजस्वी, स्वरबिंदूच्या पार गाभाऱ्यात पोहोचणाऱ्या स्वरवर्षावाने. काय सूरातला आत्मविश्वास ! स्वर लावताना मनात जरा ही शंका नाही ! कुठेच आणि कधीच ! बाप रे ! मग थोडं लक्षपूर्वक त्या स्वरांकडे पाहू लागले. त्यांची पोत, गाण्यातल्या इतर घटकांबरोबर त्यांचे वागणे, केवढा सहजपणा होता त्यात. तारातल्या माध्यम पंचमापासून खर्जातल्या धैवत पंचमापर्यंत सगळे स्वर अतिशय स्पष्ट आणि ठसठशीत होते. त्यांची गमकाची जाड स्वररेखा असो की मुर्कीतून आलेली वेगवान हलकीशी सर, पुसटपणा नावाला ही नव्हता. शरीराच्या कमजोरीला पार धुवून टाकणारे हे स्वर ऐकले की वाटत होते, कुमारांचे गात्र न् गात्र या स्वरांनी स्पंदित होतय. आणि या स्वरांचे आकार तरी किती ! मेणासारखे स्वर करून कुमार एखाद्या जादुगारासारखे कधी त्यांना आघातातून, मींडेतून, कणातून, खटक्यातून, गमकेतून घालून स्वर सहजपणे फिरवत होते. अगदी त्यांच्याशी बोलल्यासारखं. हे असं कसं बोलू शकतात ही माझी विचारांची तंद्री मला लय / तालाकडे घेऊन गेली. मध्य आणि द्रुत लयीच्या संवेदना आपल्यात जेव्हा एकरूप होतात तेव्हा हे सगळं सोप्पं होत असणार या उत्तराच्या आनंदात असताना त्यांच्या बंदिशी पाशी कधी पोहोचले हे कळलंच नाही. आता मात्र माझे डोळे विस्फारले होते. एकानंतर एक सुरेख पैठण्या समोर उलगडल्यावर जे होते अगदी तसे, हे बघू का ते बघू अस्स झालं ! नंद रागाच्या 'राजन अब तो आ' गाताना '' म्हणण्यातला लाघवीपणाने घायाळ झालेले मन 'थीर न रहत कजरा आंखन में' मधल्या 'आंखन' वर लावलेल्या ओलसर सुराला अस्फुट 'ओह' म्हणून गेले. पुढे 'अब ना सहु रे' गाताना 'रे' या अक्षराला पंचमाची आस देऊन जे षड्जावर असं उचलून ठेवलं की वाटलं धावत जाऊन त्या पिया ला सांगावे 'अरे खरच सहन होत नाही रे तिला'....  स्वरचित्र काय असत याचा अनुभव मी घेत होते .
तेवढ्यात भटियारच्या कोमल ऋषभाने मला खेचून पुढे नेले. सोहोनी - भटियारची 'म्हारो जी भूलो ना म्हाने' समोर उभी होते. कुमारांनी 'भूलो' म्हणताना भटियारच्या तार  कोमल ऋषभाला दीर्घ कंपन देऊन जी माझी अवस्था केली ..... ही अवस्था फार वेळ चांगली नाही हे ओळखूनच की काय मग त्यांनी पुढचा 'भूलो ना' तार षड्जावर स्थिरावला आणि माझा जीव भांड्यात पडला !  वाटलं आपण बोलताना जसे मध्येच थांबतो, कधी एखादेच वाक्य बोलून विषय संपवतो तसच कुमारांचे गाणे अवकाशाच्या समतोलावर बोलत आहे. त्यांची प्रत्येक बंदिश अशीच भरभरून बोलत होती.. स्वर लगावातून,स्वरांच्या दैदिप्यमान आकार ,इकार,उकारातून,आघात-अनाघातातून ,लयीच्या नोंक झोंक मधून , राग वाक्यातून, शब्द उच्चारणातून. 'शून्य गढ शहर मे' मधला अलिप्त स्वर बहार रागातल्या 'ऐसो कैसो आयो रिता रे' मध्ये 'ऐसो' ला कसे प्रश्न विचारत आहे हे बघत होते.

जन्मतःच कुशाग्र बुद्धी, संवेदनशील मन, आणि कलेतील संवाद मूल्य समजणारी प्रज्ञा लाभलेल्या कुमारांना हिंदुस्तानी संगीतातील पारंपारिक सौंदर्य मूल्य आत्मसात करून ही काही प्रश्न पडलेच होते. परंपरेच्या चौकटीत न मावणारी त्यांची प्रतिभा आपली स्वतःची चौकट तयार करण्यात रमली. त्यांच्या निडर, थेट स्वभाववृत्तीने बंडखोरी केली. कुमारांची प्रत्येक बंदिश या बंडखोरीची कहाणी मला सांगत होती. कुमार गंधर्वांच्या घरातल्या प्रत्येक खोलीत फिरताना सहज मनात आलं, 'या घराच घराणे होऊ शकेल का? छे छे ! कसं शक्य आहे? चौकट मोडलेल्याची पुन्हा चौकट ? ते तेजस्वी स्वर, सुरेलपणाचा कहर, रंध्रा रंध्रातुन बोलल्यासारखी तयार होणारी स्वरचित्रे , प्रत्येक बंदिश ऐकताना 'यांना हेच म्हणायचे होते' असा येणारा प्रत्यय पुन्हा कसा येणार ? या प्रतिभेचा एखादा बिंदू घेऊन नवीन चित्र तयार करणं हेच याचं खरं उत्तर असू शकेल असा मनाशी विचार करत श्राव्य अनुभवाने जडावलेली बुद्धी, आणि शिष्यत्वाने जडावलेले मन घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघाले ...